पुणे । सायकल चालवित येणारा खाकी रंगाच्या कपड्यातील पोस्टमन काका, हे चित्र काळाच्या ओघात हरवतंय. संवादाची साधने नसणार्या काळात पोस्टमन काकांमुळेच आपला प्रेम, जिव्हाळा आपल्या स्नेहीजनांपर्यंत पोहोचविणे शक्य होते. तंत्रज्ञानाच्या युगात त्यांच्या कार्याची ओळख नव्या पिढीला व्हावी यासाठी निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे पोस्टमनकाकांसोबत रक्षाबंधन साजरे करण्यात आले. त्यांच्या आयुष्यातील मुख्य घटक असणार्या पोस्टकार्डचीच आगळीवेगळी राखी बांधून रक्षाबंधन साजरे झाले.
भेटवस्तूंचे वाटप
निरंजन सेवाभावी संस्थेच्या सिद्धीता गटातर्फे जीपीओ मुख्य कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अश्विनी पोतदार, वरिष्ठ डाकपाल आर.एस. गायकवाड, रेखा भळगट, डॉ. प्राजक्ता कोळपकर, शुभांगी धूत, पूनम राठी, रेश्मा भट्टड, पूजा पाटील, वैशाली कासट, प्राजक्ता डागा आदी उपस्थित होते. यावेळी सर्व पोस्टमनकाकांना भेटवस्तू देखील देण्यात आल्या.
कृतज्ञता केली व्यक्त
आंतरदेशीय पत्र, पिवळसर पोस्टकार्ड, लाल रंगाच्या पत्रपेट्या आणि पत्ररुपी संवादाच्या काळात पोस्टमनकाका आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक होते. पोस्ट खात्याचे काम कमी झाले असले तरी आजही अनेकदा पत्रव्यवहारासाठी पोस्टमन शिवाय पर्याय नसतो. त्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्यासोबत रक्षाबंधन साजरे करण्यात आले, अशी माहिती शुभांगी धूत यांनी यावेळी दिली. शहरातील विविध पोस्ट ऑफीसमधील पोस्टमन या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
सेवेचे आज झाले सार्थक
आजच्या काळात मोबाईलमुळे पत्रव्यवहार कमी झाला आहे. तरीही आमचा विचार करून आमच्यासोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केला. याचा आम्हाला अतिशय आनंद होत आहे. अनेक वर्षापासून पोस्टखात्यात मी काम करीत आहे, या सेवेचे आज सार्थक झाल्याची भावना पोस्टमन गौतम वाव्हाळ यांनी यावेळी व्यक्त केली.