धुळे। महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 57 वा वर्धापन दिन 1 मे रोजी संपूर्ण राज्यात साजरा करण्यात येतो. या निमित्त विविध शासकीय, निमशासकीय तसेच खासगी संस्थामार्फत ध्वजारोहण करण्यात येतो. स्थानिक पातळीवर जनतेमार्फत राष्ट्रीय ध्वजाविषयी असलेले प्रेम,निष्ठा, अभिमान दर्शविण्याकरीता वैयक्तिरित्या छोट्या राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा, त्याची अवहेलना होणार नाही याची प्रत्येक नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक, चैतन्या एस. यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.
प्लॅस्टीक राष्ट्रध्वज वापरु नये
चैतन्या यांनी म्हटले आहे, राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा. या संदर्भात शासनामार्फत वेळोवळी सूचना दिल्या आहेत. तसेच जाणीवपूर्वक जर राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याचा प्रयत्न केल्यास राष्ट्रीय अवमान प्रतिबंध कायदा 1971 चे कलम 2 नुसार कारवाई करण्यात येते. काही वेळा राष्ट्रीय कार्यक्रमांच्या वेळी तसेच कला, क्रीडा प्रसंगी वैयक्तिकरित्या वापरण्यात येणारे राष्ट्रध्वज नंतर टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. राष्ट्र प्रतिष्ठेच्या दृष्टीने ही बाब गंभीर असल्याने केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार प्लॅस्टीक राष्ट्रध्वज वापरास मान्यता नाही. जनतेच्या वैयक्तिक वापरासाठी छोट्या कागदी ध्वजाचा वापर करण्यात यावा. तथापि अशा कागदी ध्वजाचा वापर करतांना त्याचा योग्य तो मान राखणे आवश्यक आहे. तसेच असे राष्ट्रध्वज रस्त्यावर व अन्य ठिकाणी फेकून देऊ नये, असे राष्ट्रध्वज खराब झालेले आहेत असे आढळल्यास ते ध्वजसंहितेतील तरतूदीनुसार नष्ट करण्यात यावे, असे आवाहन चैतन्या एस. यांनी केले आहे.
तरतूदीनुसार नष्ट करा
पत्रकार म्हटले आहे की, छोटे-छोटे राष्ट्रध्वज रस्त्याचे कडेला किंवा इतर ठिकाणी पडलेले, विखुरलेले आढळतात. हे दृश्य राष्ट्रीय प्रतिष्ठेला शोभणारे नसल्याने राष्ट्रध्वजाचे वापरानंतर एकतर त्याचा योग्य तो मान राहील याप्रमाणे ते ठेवण्यात यावे. अन्यथा जर राष्ट्रध्वज खराब झालेले असतील तर त्यांचा योग्य तो मान राखून ते ध्वजसंहितेतील तरतूदीनुसार नष्ट करणे आवश्यक असते. अशा प्रसंगी असे रस्त्यात पडलेले इतरत्र विखुरलेले राष्ट्रध्वज जर प्लॅस्टिकचे असतील तर प्लॅस्टिक बरेच दिवस नष्ट होत नसल्याने असे ध्वज बरेच दिवस त्या ठिकाणी दिसतात.