पुणे : समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ठ रूढी परंपरांवर आघात करून समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी अग्रेसर असलेला वारकरी संप्रदाय आता महाराष्ट्रातील हागणदारीवर प्रबोधनाच्या माध्यमातून जनजागृती करणार आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यातील ग्रामीण भागात स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी वारकरी सांप्रदायाचा सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील वारकरी सांप्रदायाचे प्रवचनकार, कीर्तनकार आणि जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाची पूर्वतयारी बैठक जिल्हा परिषदेच्या सभागृहात नुकतीच संपन्न झाली. यावेळी सांप्रदाय मंडळींनी आपल्या प्रवचन, कीर्तनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक गावात जाऊन स्वच्छतेचा जागर करण्याचे आश्वासन दिले.
26 जानेवारीपासून प्रारंभ
जिल्ह्यातील 1 हजार 400 ग्रामपंचायतमधील 1 हजार 842 गावांमध्ये कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री, प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर भागवत, ह.भ.प. अशोक काळे महाराज, गगनराज पाटील विश्वस्त, महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषद, ह.भ.प. उमेश शिंदे महाराज, ह.भ.प. तांबे महाराज उपस्थित होते. 26 जानेवारीपासून जिल्ह्यातील निवडक वारकरी प्रत्येक गावात जाऊन स्वच्छतेबाबत प्रबोधन करणार आहेत. वारकरी साहित्य परिषदेमार्फतच सदर वारकर्यांची निवड करण्यात आली आहे. बैठकीत याबातच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अंतकरणाची स्वच्छता महत्त्वाची
समाजात बदल कायद्याने होत नाहीत. त्यासाठी लोकांच्या मानसिकतेत बदल होणे गरजेचे आहे. गावातील स्वच्छतेबरोबरच वारकरी हे लोकांच्या अंतकरणाची स्वच्छता करतील, अशी अपेक्षा ह. भ. प. अशोक काळे महाराज यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी उपस्थित अधिकारी आणि वारकर्यांनी आपले विचार मांडले. या माध्यमातून शाश्वत स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, गावातील स्वच्छता सुविधांची देखभाल व दुरुस्ती, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, ओला व सुका कचरा व्यवस्थापन, शौचालय वापराची सवय व प्लास्टिक वापर बंदी, पिण्याच्या पाण्याची हातळणी व पाणी गुणवत्ता या प्रमुख बाबींवर वारकरी गावात प्रबोधन करणार आहेत.