प्रेमीयुगुलाने वैनगंगा नदी पात्रात उडी घेऊन केली आत्महत्या

0

भंडारा : वैनगंगा नदी पात्रात प्रेमीयुगुलाने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शहरालगतच्या कारधा येथे रविवारी सकाळी 10 वाजता सदरील घटना उघडकीस आली. एकमेकांचे हात ओढणीने बांधून त्यांनी नदी पात्रात उडी घेतली असून या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. विशाल गणेश शेंडे (22) आणि दीक्षा मारबते अशी मृतांची नावे आहेत. भंडारा शहरालागत असलेल्या कारधा येथील वैनगंगा नदीपात्रात रविवारी सकाळी दोन मृतदेह पाण्यावर तरंगताना काही नागरिकांना दिसले. त्यांनी या घटनेची माहिती तात्काळ कारधा पोलिसांना दिली.

दोघांचेही मृतदेह स्थानिक मासेमारांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. मृतदेहाजवळ आढळलेल्या मोबाइलच्या मदतीने त्यांची ओळख पटली. विशाल मोलमजुरीचे काम करीत होता. विशालच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, तो गुरुवारी सायंकाळी 6 वाजता शंभर रुपये घेऊन घरून निघून गेला. मात्र घरी परत आला नाही. त्याचा शोध घेऊनही पत्ता लागला नाही. त्यामुळे बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दिली होती. दरम्यान रविवारी सकाळी वैनगंगा नदीपात्रात त्याचा आणि दीक्षाचा मृतदेह आढळून आला. दीक्षा आणि विशाल हे एकमेकांचे नातेवाईक असून आपल्या प्रेमाला विरोध होत असल्याने त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली असावी असा कयास आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक गजानन कंकाळे यांच्या नेतृत्वात सुरू आहे. प्रेमीयुगुलांचे मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच वैनगंगा नदी तीरावर नागरिकांची एकच गर्दी झाली होती.