सुनील तटकरे यांनी भाजपवर डागली तोफ
नांदेड : 2014 मध्ये भाजपची देशभरात लाट होती आता मात्र या फसव्या सरकारला ओहोटी लागली आहे. मी कोकणचा आहे त्यामुळे समुद्राची भरती ओहोटी जवळून पाहिली आहे, अशी टीका करत राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी भाजप सरकारवर तोफ डागली. राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा मराठवाड्यात सुरू असून रविवारी ही यात्रा नांदेडमधील उमरी येथे पोहचली. यावेळी तटकरे बोलत होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील उपस्थित होते.
राष्ट्रवादी गप्प बसणार नाही
तटकरे म्हणाले, सरकारने शेतकर्यांबाबतही उदासीन भूमिका घेतली आहे. शेतकर्यांना जाहीर केलेली कर्जमाफी न देऊन सरकारने बळीराजाचा अपमान केला आहे. 2019 मध्ये भाजपला अपमानित केल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस गप्प बसणार नाही. बोंड अळीमुळे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले त्याची दखल घेऊन नुकसानीचे पंचनामे न करता तातडीने मदत जाहीर करावी, अशी तटकरे यांनी केली.
महिला सुरक्षेकडे सरकाचे दुर्लक्ष
सरकारवर ताशेरे ओढताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, देशाचे कृषीमंत्री कोण असा प्रश्न विचारला तर शेतकर्यांना त्यांचे नावही ठाऊक नाही. आपले प्रश्न समजण्याची आणि ते सोडवण्याची दृष्टी असलेले नेते जनतेने निवडून दिले पाहिजे. शेतीबाबत ज्यांना आस्था आहे अशा लोकांना निवडून द्या. भाजपच्या सरकारने शेतकरी हिताचा आजवर कोणता निर्णय घेतला आहे? तसेच महिलावर्गाची सुरक्षा हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. मात्र या प्रश्नाकडे लक्ष देण्याची सरकारची इच्छाशक्तीच नाही अशी टीकाही अजित पवार यांनी केली.