फायली गायब केल्याचा आरोप करत झापून काढले
हे देखील वाचा
मुंबई:अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मंत्रालयात एन्ट्री करत मुख्यमंत्र्यांच्या गृहविभागात जाऊन अधिकाऱ्यांना चांगलेच झापून काढले. बच्चू कडू यांनी चक्क मुख्यमंत्र्यांच्या गृहविभागातील फाईली महिनो महिने धूळखात पडत असल्याचे वास्तव समोर आणले. पालघर येथे काही विकासकांनी अवैध रित्या बांधकाम बांधले होते. त्याचे परिणाम सर्वसामान्यांना भोगावे लागले. एप्रिलमध्ये या संबधीत पत्र गृह विभागाला देण्यात आले होते. मे मध्ये गुन्हे दाखल झाले पण अटक का होत नाही? हे विचारण्यासाठी जेव्हा बच्चू कडू मंत्रालयात आले तेव्हा या विभागातील अनेक फाईल धूळ खात पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे बच्चू कडू यांनी गृह विभागाच्या अधिकाऱ्यांना झापले आणि फाईल्स पुढे जायला विलंब का लागतो असा जाब विचारला.
सेवा हमी कायद्यामध्ये सामान्यातील सामान्य फाईल या एक ते दोन दिवसात पुढे गेल्या पाहिजेत. तसेच 7 दिवसात या फाईलवर उत्तर मिळाले पाहिजे मात्र उत्तर सोडा पण इकडे फाईलच गायब असल्याचे उघडकीस येत असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी यावेळी केला. सरकारने कायदा आणला पण अंमलबजावणी करणारे अधिकारी तो पायदळी तुडवत असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी करत फक्त स्वार्थ असलेल्या फाईल पुढे सरकतात असा आरोप देखील त्यांनी केलाय. एखादी पैशाची फाईल पेंडीग न राहता सर्वसामान्यांच्या फाईल इथे पेंडीग राहतात असा आरोप देखील त्यांनी केला.