बसेसच्या दरवाढीमुळे मध्यमवर्गीय प्रवाश्यांचे कंबरडे मोडले

0

शिंदखेडा । दरवाढ, कामगार वेतनाचा मुद्दा पुढे करून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने 18 टक्के दरवाढ केली. रेल्वे, खासगी प्रवासी वाहतुकीच्या तुलनेत ही सर्वाधिक दरवाढ आहे. लक्झरी गाड्यांच्या बरोबरीने बसचे दर गेल्याने बसआता गरिबांची राहिली नाही. दरवाढीमुळे प्रवाशांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे आता प्रवासी संख्येत घट होण्याची भीती आहे. तर आधीच तोट्यात असलेल्या एस.टी.ला पुन्हा तोट्याच्या गर्तेत ढकलण्याची योजना सरकारनेच आखली असल्याची टीका केली जात आहे. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’या ब्रीदवाक्यानुसार बस धावू लागली. बसेसमुळे अनेक गावे जोडली गेली, त्यांच्या विकासाला गती लाभली. मात्र कालांतराने खासगी वाहतुकीने एस.टी.ला आव्हान निर्माण केले.

असा केला निर्णर
एस.टी. च्या राज्यातील प्रत्येक विभागाला दरवर्षी 40 ते 50 कोटींचा तोटा सहन करावा लागतो. आता डिझेल दरवाढ, कामगार वेतनवाढीमुळे एस.टी. ने 16 जूनपासून 18 टक्के दरवाढ केली आहे. याचा फटका प्रवाशांना बसणार आहे. साहजिकच प्रवाशांचा ओढा खासगी वाहतूक व रेल्वे प्रवासाकडे वळत आहे. कर्नाटक, गुजरात, तेलंगणा, आंध्रप्रदेशच्या तुलनेत महाराष्ट्रातील दर भरमसाठ आहे. अन्य राज्यात टप्प्याला 80 पैसे किलोमीटर पडतो, तर तोच दर महाराष्ट्रात 1.21 पैसे आहे. एस. टी. ची किती दरवाढ करावी, यासाठी समिती नेमली होती. या समितीने कमीतकमी 10 टक्के दरवाढीची शिफारस केली होती. परंतु सरकारने सरसकट 18 टक्के दरवाढ करून प्रवाशांना झटका दिला आहे.

रेल्वेपेक्षा दर पाचपट
साहजिकच भविष्यात धोकादायक खासगी प्रवासाकडे प्रवासी वळणार आहेत. यातून 10 ते 15 टक्के फटका ही एस.टी. सोसावा लागेल. 1999 मध्ये बसेसची संख्याही 18000 होती. लोकसंख्येचा विचार करता ती 25000 इतकी होणे गरजेचे होते. मात्र ती संख्या 17500 एवढीच आहे. गेल्या चार वर्षात डिझेलचे दर ज्यावेळी वाढतील त्यावेळी एस. टी. दरवाढ होत आली आहे. 2014 मध्ये जुलै व ऑगस्ट या महिन्यांत दोनवेळ दरवाढ झाली.तुलनेत रेल्वेची दरवाढ मात्र झालेली नाही. अतिशय कमी दरात रेल्वेचा सुरक्षित प्रवास सुरू आहे. त्यामुळे प्रवासी आता रेल्वेने जाणे पसंत करीत आहेत.