बारामती । बारामती-फलटण रेल्वेमार्गाच्या भूसंपादनासाठी 100 कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आहे. आता भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे. हा रेल्वेमार्ग जिरायती आणि बागायती भागातून जाणार असल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान आहे. त्यामुळे या भूसंपादनाला त्यांचा विरोध आहे. मात्र, बारामती तालुक्यातील बाधित शेतकर्यांनी चक्क रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या छायाचित्रासमोर आरती करून ‘आता तुम्हीच शेतकर्यांचे ‘प्रभू’ आहात,’ असे म्हणून साकडे घातले.
बारामती तालुक्यातील शेतकरी रेल्वे भूसंपादनाच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. रेल्वेमार्ग जिरायती आणि बागायती भागातून जात आहे. त्यामुळे 13 गावांतील 170 हेक्टर जमीन संपादित होणार आहे. या रेल्वेमार्गाच्या माध्यमातून बारामती देशाच्या नकाशावर येणार आहे. त्याचबरोबर दळणवळणाची मोठी सोय होणार आहे. लोणंद-फलटण मार्गाचे काम मार्गी लागले. मात्र, सुरुवातीपासूनच बारामतीतून या मार्गाला विरोध झाला. त्यामुळे जिरायती भागातून मार्ग नेण्यास मान्यता देण्यात आली आहे. रेल्वेने महसूल खात्याकडे भूसंपादनासाठी निधीदेखील वर्ग केल्याची माहिती प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी दिली. जिरायत भागासह पश्चिम भागातून जाणार्या बारामती-फलटण रेल्वेमार्गासाठी येत्या दोन दिवसात भूसंपादन प्रक्रिया सुरू होणार आहे. याला विरोध करत भूसंपादन होणार्या गावातील शेतकर्यांनी मध्यवर्ती प्रशासकीय भवनासमोर नुकतेच आंदोलनही केले.
नव्या कायद्याने मोबदला
या मार्गासाठी नव्या भूसंपादन कायद्यानुसार शेतकर्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळणार आहे. याशिवाय ज्या शेतकर्यांच्या जमिनी जाणार आहेत, त्यांच्या कुटुंबातील एकाला रेल्वेत नोकरीस घ्यावे, यासाठी प्रयत्न राहणार आहेत, असे प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. भूसंपादनाचा 100 कोटींचा निधी वर्ग झाला आहे.आणखी 50 कोटी रुपयेदेखील तत्काळ उपलब्ध होणार आहेत. बाधित शेतकर्यांशी चर्चा करून मार्ग काढणे आवश्यक आहे. विरोध नसेल तर 6 महिन्यांत भूसंपादनाचा विषय मार्गी लागणार असल्याचे निकम यांनी सांगितले.