जळगाव : तालुक्यातील बिलखेडा येथील 62 वर्षीय शेतकर्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. माधवराव श्रावण कुंभार (62) असे मयत शेतकर्याचे नाव आहे.
घरी एकटेच असताना गळफास
शेती करुन उदरनिर्वाह करणारे कुंभार हे मंगळवारी घरी एकटेच होते तर पत्नी शेतात गेली होती व मुले कामावर होते. दुपारी दोन वाजेच्या सुमारास माधवराव कुंभार यांनी राहत्या घरात गळफास घेतला. गावातील नागरीकांमुळे घटना समोर आली. घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस पाटील मुकूंदा पाटील यांनी घटनास्थळ गाठले. एमआयडीसी पोलिसांनाही माहिती कळविण्यात आली. त्यानुसार सहाय्यक फौजदार राजेंद्र उगले, पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल पाटील, हेमंत पाटील यांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. मयत माधवराव कुंभार यांच्या पश्चात पत्नी कमलबाई , दोन मुले मुकूंदा व दुर्गेश तसेच मुलगी जयश्री असा परीवार आहे. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.