बीसीसीआयची अंबाती रायडूवर दोन सामन्यांची बंदी

0

मुंबई । भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू अंबाती रायुडूवर बीसीसीआयने दोन सामन्यांची बंदी घातली आहे. 11 जानेवारी रोजी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधील सामन्यातील त्याच्या वागणुकीसाठी ही बंदी घालण्यात आली आहे. दोन सामन्यांच्या बंदीमुळे अंबाती रायडूला आता विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्व्हिसेस आणि झारखंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांना मुकावे लागणार आहे. अंबाती रायडू हैदराबाद संघाचे नेतृत्त्व करतो. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये 11 जानेवारीला कर्नाटक आणि हैदराबादमधील सामन्यात पंचांच्या एका निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. फिल्ड अंपायर अभिजीत देशमुख, उल्हास विश्‍वासराव गंधे आणि थर्ड अंपायर अनिल दांडेकर यांनी अंबाती रायडूवर आरोप निश्‍चित केले होते. रायडूने त्याच्यावरील आरोप स्वीकारले आहेत. त्यामुळे आता बीसीसीआयने त्याला चुकीची शिक्षा दिली आहे. 205 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा संघाने निर्धारित 20 षटकात 203 धावा केल्या. पण सामना संपल्यानंतर हैदराबादचा कर्णधार अंबाती रायडू आपल्या संघासह मैदानात आला आणि सुपरओव्हर खेळवण्याची मागणी करु लागला. मलाही नियम माहित आहेत. अंपायरने कोणाला बाद दिले तर तो मैदानातून बाहेर जातो. बाहेर गेल्यानंतर त्याला समजते की त्याला चुकीच्या पद्धतीने बाद केले, तर त्याला परत बोलावले जाते का?, असे रायडू म्हणाला.

यामुळे रायडूने नाराजी व्यक्त केली
हैदराबादचा गोलंदाज मोहम्मद सिराज 20व्या षटकात गोलंदाजी करत होता. अखेरच्या बॉलवर कर्नाटकचा फलंदाज करुण नायरने शॉट मारला. बाऊंड्रीवर फिल्डिंग करणार्‍या मेहदी हसनने चौकार जाण्यापासून रोखलं. पण रिप्लेमध्ये पाहिल्यावर त्याच्या पायाचा बाऊंड्री लाईनला स्पर्श झाला होता. परंतु पंचांनी आधी दोन धावाच दिल्या होत्या. कर्नाटकचा संघ फील्डिंगसाठी मैदानात आल्यावर कर्णधार विनय कुमारने याबाबत पंचांना सांगितले. यानंतर कर्नाटकच्या एकूण धावसंख्येत दोन अतिरिक्त धावा जोडण्यात आल्या. या सामन्यात हैदराबादला विजयासाठी सुरुवातीला 203 धावांची गरज होची. पण पंचांच्या निर्णयानंतर आव्हान 205 धावांचे झाले. पण असे होते तर हा निर्णय डाव संपण्याच्याआधीच द्यायला हवा होता, असे रायडूचे म्हणणे होते.