पिंपरी-चिंचवड : बैलगाडा शर्यतीच्या कायद्याला सरकारने अधिसुचनेद्वारे राजपत्रात प्रसिद्धी दिलेली असून, या शर्यतीबाबत नियम व अटी प्रसारित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. लवकरच सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर धावपट्टीवर बैलगाडा शर्यती चालू होतील, अशी माहिती राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी दिली. बैलगाडा शर्यतीच्या कायद्याची तत्काळ अंमलबजावणी करण्याबाबत आमदार महेश लांडगे व अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटनेच्या सदस्यांनी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीप्रसंगी झालेल्या चर्चेवेळी जानकर यांनी ही माहिती दिली.
यांची होती उपस्थिती
पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, पशुसंवर्धन विभागाचे सचिव विकास देशमुख, आमदार महेश लांडगे, आमदार राहुल कुल, अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे नितीन शेवाळे, संदीप बोदगे, रामकृष्ण टाकळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नवनाथ होले, अनिल लांडगे, केतन जोरे, नितीन टाकळकर आदींची याप्रसंगी उपस्थिती होती.
गणेशोत्सवापासून लागते वेध
दरवर्षी गणेशोत्सवापासून बैलगाडा मालक व शेतकर्यांना बैलगाडा शर्यतीचे वेध लागतात. बैलगाडा मालकांकडून गणेशोत्सवापासूनच बैलगाडे पळविण्याची सुरुवात केली जाते. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आहे. आता गणेशोत्सव अवघ्या 15 दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे बैलगाडा मालक, शेतकरी व शेतमजुरांना बैलगाडा शर्यतीचे वेध लागले आहेत. अनेकांनी आतापासूनच तयारीदेखील सुरू केली आहे. सरकारने बैलगाडा शर्यतीला मंजुरी दिल्याचे जाहीर झाल्यापासून सर्वांचा उत्साह दुणावला आहे. त्यामुळे लवकरात लवकर बैलगाडा शर्यती सुरू कराव्यात, अशी मागणी चर्चेदरम्यान आमदार महेश लांडगे यांनी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्याकडे केली.
22 जुलै रोजी राष्ट्रपतींची स्वाक्षरी
बैलगाडा शर्यतीबाबत आमदार महेश लांडगे व अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटना मागील काही वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा करीत होते. 22 जुलै रोजी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी बैलगाडा शर्यतीच्या विधेयकावर स्वाक्षरी केली. त्यामुळे बैलगाडा मालकांसह शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. प्राण्यांना क्रुरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, 1960 मध्ये सुधारणा करत बैलगाडा शर्यतीला मान्यता देण्यात आली आहे.
जिल्हाधिकार्यांच्या परवानगीनंतर आयोजन
महाराष्ट्र राज्यात जिल्हाधिकार्यांच्या परवानगीने बैलगाडा शर्यत आयोजित करता येणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून अधिसूचना काढून बैलगाडा शर्यतीबाबत नियम आणि अटी प्रसिद्ध करण्यात येतील. सांस्कृतिक परंपरांना सुरू ठेवणे, हा या मागचा प्रमुख उद्देश आहे. शर्यतीत वापरण्यात येणार्या प्राण्याला कोणत्याही प्रकारची इजा पोहोचता कामा नये; अन्यथा संबंधितांवर पाच लाख रुपयांपर्यंत आर्थिक दंड किंवा तीन वर्षापर्यंत कारावास होऊ शकणार आहे.
पुन्हा एकदा भिर्रर्रर्र ऽऽ
बैलगाडा शर्यती सुरू झाल्याने सांस्कृतिक व पारंपरिक प्रथांचे रक्षण होणार आहे. तसेच बैलांच्या मूळ प्रजातींचे संवर्धन वाढीस लागून नवीन प्रजातींची पैदास चांगल्या पद्धतीने होणार आहे. जनावरांची शुद्धता, सुरक्षा आणि स्वास्थ्य यामुळे सांभाळणे सोयीस्कर होणार आहे. केंद्रासह राज्य शासनाने बैलगाडा शर्यतीसाठी मान्यता दिल्याने बैलगाडा मालक व शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आता पुन्हा एकदा शर्यतीच्या मैदानात भिर्रर्रर्र ऽऽ आवाज घुमणार आहे.