भरधाव चारचाकी उलटल्याने धुळ्यातील तिघे ठार तर दोघे गंभीर जखमी

0

कसारा घाटात उलटले वाहन : मुंबईकडे जाताना दुर्घटना

धुळे- भरधाव चारचाकीवरील नियंत्रण सुटल्याने चारचाकी उलटून धुळ्यातील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार, 14 रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाटाजवळील आडगाव-पेंडरघोळ येथे घडली. या अपघातात दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात शर्थीचे उपचार सुरू आहेत. अपघातानंतर शहापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवले.

मुंबईकडे जाताना उलटली भरधाव चारचाकी
धुळ्यातील कुमार नगरातील रहिवासी चारचाकी स्वीप्ट (एम.एच.18 ए.जे.7228) ने मुंबई-नाशिक महामार्गावरून मुंबईकडे जात असताना शहापूर पोलिस ठाणे हद्दीतील आडगाव-पेंडरघोळजवळ वाहनावरील नियंत्रण सुटल्याने चारचाकी रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातात वाहन चालक ललितकुमार मनोहरलाल भारद्वाज (47), राजू सुंदरदास भाटीजा (68) व कुमार नरोत्तम बियालानी (57) हे जागीच ठार झाले तर रमेश कुकरेजा यांच्यासह अन्य एक जण जखमी झाला. अपघातानंतर शहापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक महेश शेठे, सहाय्यक निरीक्षक गजेंद्र पालवे, भरत गांगुर्डे, अनिल नवाल यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना शहापूर (जि.ठाणे) येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलवले तर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.