भरधाव ट्रकने ३ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना चिरडले; एकाचा जागीच मृत्यू

0

संतप्त नागरीकांनी टायर पेटवून केला चक्का जाम

नागपूर : जिल्ह्यातील भिवापूर येथे भरधाव जाणाऱ्या ट्रकने ३ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना चिरडल्याची घटना घडली आहे.शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास राष्ट्रीय विद्यालय भिवापूर येथील विद्यार्थी सायकलने महाविद्यालयात जात असताना हा अपघात झाला. या झालेल्या अपघातात एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला असून २ विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यातील एकाची परिस्थती गंभीर असल्याचे स्थानिकांनी सांगितले. दरम्यान अपघात होताच वाहन चालक घटनास्थळावरुन पसार झाला.

अपघातामुळे संतप्त नागरिकांनी टायर जाळून चक्काजाम आंदोलन केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. भिवापूर मार्गावरील वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रस्त्यावरील आग विझवत संतप्त जमावाला शांत केले.