तळोदा:अक्कलकुवा बायपास रस्त्यावर असलेल्या भरवाड वस्तीत रविवारी, 24 रोजी दुपारी एक वाजता खर्डी नदीतील कचऱ्याला लावलेल्या आगीमुळे तीन घरे जळून खाक झाली. या आगीत भरवाड कुटुंबाचे सुमारे आठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
सविस्तर असे, अक्कलकुवा-तळोदा बायपास रस्त्यावर खर्डी नदीच्या पुलाजवळ भरवाड कुटुंबे राहतात. त्यात तेजा हरी भरवाड, रेवा हरी भरवाड व हमीर हरी भरवाड या तिन्ही भावांची घरे आहेत. पुरुष सदस्य गायी चारायला तर घरी केवळ महिला व मुली होत्या. त्याचवेळी दुपारी एक वाजता खर्डी नदीत असलेला कचरा जाळण्यात आला. तो कचरा जळाल्यामुळे हवेने त्यातील ठिणगी उडून या तिघा घरांना आग लागली. आगीत गुरांसाठी असलेला चारा, घरातील धान्य , कपडे, कपाट, दुधाचे कॅन,संसारोपयोगी साहित्य सारे काही आगीच्या भस्मस्थानी सापडले.
दरम्यान, हवेचा वेग जास्त असल्याने आग पाहता पाहता पसरली. त्यात गोवरे, कुटार, करबाड आदी सुकलेले साहित्य असल्याने आग अधिकच धुमसत होती.