भाजप-सेनेने एकत्र येऊन पुढील मुख्यमंत्री ठरवावा-चंद्रकांत पाटील

0

कोल्हापूर : भाजप-शिवसेनेत सद्या भातुकलीचा खेळ सुरु आहे. निवडणुका वर्षभरानंतर आहेत मात्र आतापासून युतीबाबत चर्चा होत आहे. भाजप शिवसेनेशी युती करण्याबाबत सकारात्मक आहे मात्र शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला आहे. यावर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सूचक व्यक्तव्य केले आहे. भाजप आणि शिवसेनेने मिळून पुढील मुख्यमंत्री ठरवणे उचित होईल असे विधान त्यांनी केले आहे. ते कोल्हापूरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

शिवसेना आणि भाजप एकत्र न आल्यास मतविभागणीचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला होण्याची भीतीही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल असे वक्तव्य केले होते. शिवसेनेच्या वर्धापन दिन मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी राज्याचा पुढील मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल, अशी घोषणा करुन शिवसैनिकांना सत्ता आणण्यासाठी सज्ज राहण्यास सांगितले.

आपला मुख्यमंत्री व्हावा असे प्रत्येकालाच वाटते. २०१९ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजपचा मुख्यमंत्री होईल असे आम्हाला वाटते. खरे तर राज्याचा मुख्यमंत्री कोण असावा हे भाजपा-शिवसेनेने एकत्रित येऊन ठरवले पाहिजे. शिवसेनेने त्यांचा मुख्यमंत्री होणार असा दावा करायचा दुसरीकडे आम्ही आमचा मुख्यमंत्री होणार असे म्हणायचे. यात काँग्रेस-राष्ट्रवादीला मतविभाजन होऊन फायदा होऊ नये हीच आमची इच्छा आहे असं चंद्रकांत पाटील म्हणाले.