भारतातील ८० टक्के रूग्णांमध्ये करोनाची लक्षणेच नाहीत

0

नवी दिल्ली – करोना व्हायरसमुळे संक्रमीत झालेल्या रूग्णांची संख्या दररोज वाढतच आहे. देशातील एकूण रूग्णांची संख्या १७ हजारांच्या पुढे गेली आहे. दररोज रूग्णांच्या संखेत वाढ होत असतानाच एक चिंताजनक माहिती समोर आली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्थेने (आयसीएमआर) दिलेल्या माहितीनुसार, जवळपास ८० टक्के रूग्णांमध्ये करोनाची कोणतीही लक्षणे दिसून आलेली नाहीत. त्यामुळे करोना बाधितांचा शोध घेऊन उपचार करणे कठीण जात आहे.

आयसीएमआरच्या साथी आणि संसर्गजन्य रोग विभागाचे राष्ट्रीय प्रमुख पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, पॉझिटीव्ह अहवाल आढळलेल्या जवळपास ८० टक्के रूग्णांमध्ये करोनाची कोणतीही लक्षणे दिसून आली नाहीत. ही बाब चिंताजनक आहे. पण आशावेळी करोनाचा तपास लावण्याचा एकच पर्याय आहे तो म्हणते करोनाबाधित रूग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेले आणि परिसरातील सर्वांची करोना चाचणी करणे. त्याशिवाय करोनाबाधितांचा शोध घेणं कठीण जाणार आहे. जर अशा पद्धतीने तपासणी नाही केली तर भारताची परिस्थिती अवघड होईल, असेही गंगाखेडकर म्हणाले.