नवी दिल्ली : भारत आणि विंडीज यांच्यामधील दुसरा एकदिवसीय सामना बरोबरीत सुटला. या सामन्यात दोनही संघाने निर्धारित ५० षटकात ३२१ धावा केल्या. सामन्यात कर्णधार विराट कोहलीने नाबाद १५७ धावा केल्या. अंबाती रायडू वगळता कोणत्याही फलंदाजाने त्याला अपेक्षित साथ दिली नाही. पण विराटने आपला खेळ सुरूच ठेवत प्रशंसनीय खेळ केला आणि भारताला ३२१ धावांपर्यंत पोचविले. त्याच्या या खेळीचे हरभजनने कौतुक केले असून कोहली हा सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतो आणि समर्थपणे पेलतो, अशा शब्दात त्याने विराटची प्रशंसा केली.
कोहली हा उत्तम खेळाडू आहे. तो खेळपट्टीवर आला की सामन्याचा ताबा घेतो आणि आपल्या खेळाणे चाहत्यांना खुश करतो. त्याच्याकडून ज्या अपेक्षा संघाला आणि चाहत्यांना असतात, त्या साऱ्यांची जबाबदारी तो स्वतःच्या खांदयावर घेतो आणि समर्थपणे पेलतो. अशा खेळाडूला माझा सलाम, असे हरभजनने म्हंटले आहे.
कोहलीची मैदानावर खेळताना खेळाप्रती असलेली निष्ठा वाखाणण्याजोगी असते. त्याचा खेळ अविश्वसनीय असतो. म्हणूनच तो रन-मशीन आहे. त्यामुळे विराट कोहली बनणे हे सोपे नाही. त्यासाठी विशेष गुणवत्ता असावी लागते आणि ती गुणवत्ता कोहलीमध्ये आहे. म्हणूनच कोहली कौतुकास पात्र आहे, असेही हरभजन सिंगने म्हंटले आहे.