पुणे । जातीयवादी शक्तींनी मराठा आणि दलित समाजाला भडकवल्यानेच वढू गावातील दुर्दैवी प्रकार घडला आहे. मात्र यापुढे अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी प्रयत्न करणार असल्याचे दोन्ही समाजाच्या नेत्यांकडून शुक्रवारी सांगण्यात आले. तसेच येत्या काळात मराठा दलित सामाजिक सलोखा परिषद घेण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेला पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष रमेश बागवे, आमदार शरद रणपिसे, मराठा क्रांती मोर्चाचे शांताराम कुंजीर. उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, मराठा महासंघाचे प्रवीण गायकवाड. आरपीआय शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, दलित नेते राहुल डबाळे आदी नेते उपस्थित होते.
यावेळी दोन्ही समाजातील नेत्यांनी प्रमुख मागण्या मांडल्या यामध्ये जातीय तेढ वाढवणार्या दंगेखोरांवर आणि त्यांचे मास्टर माईंड यांच्यावर कठोर कारवाई करा, हिंसाचाराचे सूत्रधार असणारे मिलिंद एकबोटे आणि संभाजी उर्फ मनोहर भिडे व त्यांच्या समर्थकांना अटक करून त्यांची नार्कोटेस्ट करण्यात यावी, या घटनेतील नुकसानग्रस्त लोकांना भरपाई देण्यात यावी, या घटनेत मृत राहुल फटांगडे यांच्या कुटुंबियांस 25 लाखांची मदत मिळावी, जखमी झालेल्या नागरिकांना 2 ते 5 लाखांची मदत मिळावी या मागण्यांसोबतच 28 डिसेंबरला वढूत झालेल्या हिंसाचाराची चौकशी करून सुत्रधारांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.