मत मांडण्याचा अधिकार फक्त मोदी भक्तांनाच आहे का?

0

लोकशाहीत कोणतीही सत्ता निरंकुश असेल तर बिथरल्याशिवाय राहत नाही. जे इंदिरा गांधींचे झाले तेच मोदींचे होणार का? हा प्रश्‍न आहे. पण गमतीचा भाग म्हणजे मोदी बिथरण्याआधी त्यांचे भक्त बिथरले आहेत. त्यांनी संयम ठेवावा. एखाद्याचा विचार पटत नाही, तर तो मुद्द्याने खोडून काढावा. सदर लेखाचा प्रतिवाद करणारा दुसरा लेख लिहावा. पण देशद्रोही, गद्दार अशी भाषा का? मतं पटत नसतील तर संयमाने खुशाल खोडून काढा ना! पण मुद्द्यावर न बोलता देशभक्तीचे डोस दुसर्‍याला पाजू नये. कारण या मातीवर प्रत्येकाचेच प्रेम आहे. आपल्याच देशात आपल्यालाच देशद्रोही म्हटल्यावर वेदना होतात. जिभ उचलून टाळ्याला लावण्याआधी अकलेचा उपयोग केला, तर बरे होईल.

1998 ला मी माझ्या पत्रकारितेस प्रारंभ केला. जवळपास आज 18 वर्षे झाली. सुरुवातीस काही काळ वार्ताहर म्हणून काम केले.2002 ते 2006 पर्यंत उपसंपादक म्हणून काम केले.2006 ते आजतागायत संपादक म्हणून काम करतो आहे. या संपूर्ण काळात माझी बांधिलकी केवळ या मातीशी व सत्याशी राहिली आहे. कधी कुठला पक्ष किंवा कुठल्या नेत्याच्या वळचणीला जाऊन काम केले नाही. कुणाची तळी उचलली नाहीत. परखडपणे जे सत्य असेल ते मांडत राहिलो. सगळे लिहिले, पण आपला आवाज गुदमरल्यासारखे कधी झाले नाही. आपली मुस्कटदाबी होतेय असे कधी वाटले नाही, पण आज तसे वाटते आहे. कधी कधी वाद व्हायचे, क्वचित एखादा अतिशहाणा धमकवायचा.पण आवाजच बंद झाला पाहिजे, विरोधात लिहिलेच नाही पाहिजे, असा प्रयत्न कुणी केला नाही. त्या वेळी काँग्रेस सरकारच्या विरोधात लिहिले म्हणून भाजप समर्थक, गद्दार, देशद्रोही अशा उपाध्या कोणी बहाल केल्या नाहीत. आज मात्र चित्र वेगळे आहे. या देशात मत मांडायचा, टीका करावयाचा अधिकार फक्त मोदी समर्थकांनाच आहे की काय ? असा प्रश्‍न पडल्यावाचून राहत नाही.कारण त्यांनी कुणाला काहीही म्हटले तर चालते. ते सर्व संस्कृतीत, सभ्यतेत बसते. मग ते कितीही असभ्य असले, तरी मोदी समर्थक सोडून बाकी कुणाला विरोधात बोलायचा, लिहायचा हक्क नाहीच, असे अघोषित वातावरण निर्माण केले जात आहे. लिहले तर बरीच भक्तमंडळी शिव्या घालते. देशद्रोही ठरवते, काँग्रेसचे हस्तक,केजरीवाल समर्थक ठरवून मोकळी होते. काही मोदी समर्थक खूप संयमाने बोलतात. विचाराला विचाराने वाद घालतात .पण बर्यापैकी मंडळी अकलेशी पिढीजात वैर असल्यासारखे बोलतात.बर्याचवेळा निट न वाचताच वाद घालतात.ते मोदींचे समर्थक आहेत याचा अर्थ मोदींनी त्यांना देश सातबार्यावर लिहून दिला आहे किंवा मोदी या देशाचे मालक आहेत व हे त्यांचे वारस आहेत. अशाच मानसिकतेत ते वावरत आहेत.देशहिताचे फक्त आपल्याला व मोदींनाच कळते .बाकी सगळे बेअक्कल आहेत .शिवाय देशभक्तीचे टेंडर यांनीच भरले आहे.आणि मोदींनी यांनाच ठेका दिलाय .या मानसिकतेत हे आहेत.देशभक्ती म्हणजे काय तर हे जे म्हणतात तीच देशभक्ती ,मोदी जे करतात तेच देशप्रेम . बाकी सगळे देशाचे शत्रू आहेत . अशी रितसर घोषणा करणेच फक्त बाकी राहिले आहे. हा सगळा प्रकार लोकशाहीच्या मुळावर उठणारा आहे.आजवर जगातल्या प्रत्येक मोठ्या माणसाची वाट त्याच्याच आंधळ्या व मुर्ख भक्तांनी लावली आहे.हा इतिहास आहे.मोदींना जर या देशात काही वेगळे करावयाचे असेल तर हेच मोदींचे आंधळे भक्त मोदींच्या कामाची वाट लावल्याशिवाय सोडणार नाहीत .स्वताच्या झुंडशाहीतून मोदींची प्रतिमा मलिन केल्याशिवाय राहणार नाहीत.मोदींच्या कामातला सर्वात मोठा अडसर हीच आंधळ्यांची जत्रा ठरेल .यात शंका नाही.मोदींनी काळ्या पैशाला आवरण्यासाठी जेवढे प्रयत्न चालवले आहेत तेवढेच प्रयत्न या आंधळ्या भक्तांना आवरण्यासाठी करावेत. गेल्या दोन अडीच वर्षात पाहतोय .येणार्या प्रतिक्रिया ऐकतोय .मोदी भक्त ज्या भाषेत बोलताहेत ,ज्या पध्दतीने बोलताहेत ते भयंकर आहे .खरेतर भक्त व्हायला अक्कल लागत नाही .पण पवित्र ह्रदय मात्र लागते .इथे भक्त मंडळी द्वेषाने ,तिरस्काराने भरली आहे.अकलेचा पत्ताच नाही पण ह्रदयातही पवित्रता नाही .याला काही अपवाद आहेत .पण बावळटांची गर्दी जास्त आहे. हम करे सो । मानसिकता अशीच राहिली तर घटनेचे व लोकशाहीचे अस्तित्व फार काळ राहणार नाही. कारण या अंध भक्तांना लोकशाही प्रक्रियाच मान्य नाही. सत्य मांडायचेच नाही हे कसे काय? मोदी सर्व देशासाठी करतायत तुम्ही का आडवे पडताय, असा प्रश्‍न करून दमबाजी करणारे, देशद्रोही ठरवणारे अनेकजन भेटले.नोटाबंदीनंतरच्या गचाळपणाचा लोकांना होणारा त्रास मांडल्यावर अनेकांना राग आला.पत्रकारांनी वास्तव लिहीणेे हा पत्रकारांचा धर्म आहे. तो धर्म मी निभावतो आहे. हा देश घटनेनुसार चालतो अन् चालला पाहिजे. कारण देशात लोकशाही व्यवस्था आहे. लोकांनी लोकांच्यासाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही. ही लोकशाहीची व्याख्या आहे. प्रसिद्ध तत्त्ववेत्ता व्हॉलटेअर असे म्हणतो की, मला तुमचे मत मान्य असेलच असे नाही, पण तुम्हाला तुमचे मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे अन् त्या अधिकाराचे मी प्राणपणाने रक्षण करेन इथे हे सांगितले तर कोण व्हॉलटेअर, त्याचा काय संबंध? असे विचारले जाईल. मुळातच आहे ही घटनाच मान्य नाही. दुसर्‍यालाही काही मतं असू शकतात.हेच स्वीकारले जात नाही. तिथे मत मांडण्याच्या अधिकाराचे व ते मांडणार्‍याचे रक्षण कोण करणार? अशा स्थितीत व्हॉलटेअर कोण स्वीकारणार व समजून घेणार? भक्तांना हे कोण समजून सांगणार? केवळ भक्तांनाच नव्हे, तर त्यांच्या दैवतालाही हे समजवून सांगावे लागेल. कारण आडातच नसेल तर पोहर्‍यात कोठून येणार? मोदी संसदेत जात नाहीत. त्यांना संसदीय चौकट पेलवत नाही.संसदेत उपस्थित राहत नाहीत. बहुमताच्या जोरावर विरोधकांचीच नव्हे, तर संसदेची मुस्कटदाबी सुरू आहे. मोदी या देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांचे व आमचे काही वैर नाही. मोदींनी आमचा बांधही बळकावला नाही. आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे. पण म्हणून त्यांच्या काही निर्णयाचा, कामाचा फटका लोकांना होत असेल, त्याचा त्रास लोकांना होत असेल तर ते मांडणे गुन्हा आहे काय? आम्हीही देशहिताचाच विचार करतो. त्याच विचारापोटी सरकारच्या, प्रशासनाच्या चुका निदर्शनास आणून देतो. आमचेही या मातीवर निस्सीम प्रेम आहे. मग आमच्या देशप्रेमावर शंका घेणारी, आम्हाला देशद्रोही ठरवणारी ही बांडगुळं कोण? देशभक्तीची सर्टिफिकेट वाटण्याचा अधिकार, ठेका यांना कुणी दिला? बहुमताच्या घमेंडीत इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लादली.लोकांनी ते सरकार उलथवून टाकले. मोदी भक्त असेच मग्रुरी करत राहिले, तर त्या इतिहासाची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही.

प्रासंगिक- दत्तकुमार खंडागळे
9561551006