भोपाळ- मध्य प्रदेशमधील काँग्रेस सरकारने कर्मचाऱ्यांना वंदे मातरम् गीत म्हणण्यावर बंदी घातली आहे. राज्य सचिवालयाबाहेर दर महिन्याच्या पहिल्या तारखेला काम सुरू करण्याच्या आधी वंदे मातरम् म्हणण्याची पद्धत होती. परंतु काँग्रेस सरकारने ती पद्धत मोडीत काढली आहे. कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले आहे की, वंदे मातरम् म्हणण्यापेक्षा जनतेच्या कल्याणाची कामी करण्यावर लक्ष्य केंद्रित करा.
कमलनाथ यांच्या या निर्णयावर भाजपाने टीका केली आहे. कमलनाथ सरकारच्या राज्यात कर्मचाऱ्यांना वंदे मातरम् बोलण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळेच दर महिन्याच्या पहिल्या तारखेला भोपाळमध्ये होणाऱ्या वंदे मातरमचं गीत गायन आज १ जानेवारी २०१९ रोजी झालेले नाही. परंतु तत्पूर्वीच्या सरकारमध्ये हे दर महिन्याच्या पहिल्या तारखेला नित्य नियमाने होत होते.
ज्या वंदे मातरमसाठी स्वातंत्र्याचे युद्ध लढण्यात आले, त्याच्याशी काँग्रेसचे काही देणेघेणे नसून त्यावरूनच त्यांच्या मानसिकतेचे दर्शन घडते. सूर्यनमस्काराला जगाने स्वीकारले आहे, त्यावरही काँग्रेस बंदी घालू पाहत आहे. काँग्रेस समाजात नकारात्मकतेचे विष पसरवत असल्याची टीका भाजपा सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या उमा शंकर यांनी केली आहे.