महागाईने गाठला 5 महिन्यांचा नीचांक

0

नवी दिल्ली । किरकोळ बाजारातील महागाई दर 5 महिन्यांच्या नीचांकी स्थरावर आला आहे. सीपीआय अर्थात ग्राहक किंमत निर्देशांक 2.17 टक्क्यांवर पोहोचला आहे. भाजीपाल्याचे-अन्नधान्याचे दर कमी झाल्याने मे महिन्यात किरकोळ बाजारातील महागाई दरात घट झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

असा कमी झाला दर
याआधी एप्रिल महिन्यात हा दर 2.99 टक्के होता. मे महिन्यात महागाईचा दर एप्रिलमधील 2.99 टक्क्यांवरून कमी होऊन तो 2.17 टक्के झाला आहे. गेल्यावर्षीच्या मे महिन्यात महागाई दर 5.76 टक्के होता. तसेच गेल्या महिन्यात अन्नधान्याचा किरकोळ दर उणे 1.05 टक्क्यांवर आला. याशिवाय, फळे, कपडे, इंधन आणि घरांच्या किंमतीदेखील कमी झाल्या आहेत.

… तर महागाई कमी होईल
दरम्यान, महागाई कमी झाल्यामुळे ऑगस्ट महिन्यात होणार्‍या द्वैमासिक समीक्षेत रिझर्व्ह बँक व्याजदरात घट करण्याची शक्यता आहे. जून ते सप्टेंबर या काळात भारतात 70 टक्के पाऊस पडतो. जर पाऊस चांगला झाला तर भरघोस उत्पादनामुळे पुढच्या काळातही महागाईवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या चलन समीक्षेत रिझर्व्ह बँकेने आपल्या पतधोरणात कुठल्याही प्रकारचे बदल केले नव्हते. विशेष बाब म्हणजे महागाईच्या दरात झालेली घट ही रिझर्व्ह बँकेने निश्‍चित केलेल्या लक्ष्यापेक्षा कमी आहे. या काळात महागाईचा दर 4 टक्क्यांपर्यंत नियंत्रित करण्याचे निश्‍चित केले होते. तसेच या काळात गेल्यावर्षीच्या तुलनेत अन्नधान्याच्या किमतीत 1.05 टक्के घट झाली आहे. तर एप्रिल महिन्यामध्ये औद्योगिक उत्पादनामध्ये वाढ झाली आहे. मार्चमध्ये औद्योगिक वृद्धीचा दर 2.7 टक्के होता. हा दर एप्रिलमध्ये वाढून 3.1 टक्के झाला आहे.