महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमात सुधारणा

0

मुंबई- महानगरपालिकेच्या जमिनीवर वसलेल्या अनधिकृत झोपडपट्ट्यांमधील पात्र झोपडीधारकांना त्यांच्या धारणक्षेत्रानुसार आता वैयक्तिक स्वरूपात जमिनीचे पट्टेवाटप करता येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय मंगळवारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार यापूर्वी केवळ झोपडीधारक सदस्य असणाऱ्या सहकारी संस्थांनाच जमिनी देता येत होत्या. मात्र, यामुळे त्यांचे पुनर्वसन करताना अनेक अडचणी येऊन प्रकल्प वेळेत पूर्ण होत नव्हते. मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार होणाऱ्या सुधारणेनंतर पात्र ठरणाऱ्या झोपडीधारकांना याचा लाभ होणार आहे. पात्र झोपडीधारकांना पट्टेवाटप करताना लागू करावयाच्या अटी व शर्ती, त्याचप्रमाणे आकारावयाच्या अधिमूल्याची रक्कम शासन निश्चित करणार आहे, असे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले.