माहुलगांव येथील रिफायनरी कंपन्यांवर कारवाई करा – आमदार सुनिल प्रभु

0

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

नागपुर:- मुंबई उपनगरातील माहुलगांव येथे असलेल्या रिफायनी कंपन्यांमूळे होणारे वायू प्रदुषण, तसेच दुषीत पाण्यामुळे परिसरातील रहिवाश्यांच्या आरोग्यास प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. वायु प्रदुषणामुळे या परिसरात अनेक मृत्युच्या घटना होत असल्याने परिसरातील नागरीकांनी वायु प्रदुषण करणाऱ्या कंपन्यांच्या व्यवस्थापनावर कठोर कारवाई करावी अशी वेळोवेळी मागणी शासनाकडे करुनंही कोणतीच निर्णयात्मक उपाययोजना करण्यात आलेली नाही.

त्यामुळे माहूल गावात राहणाऱ्या नागरीकांच्या निरोगी स्वास्थ्यासाठी आणि मानवाधिकार यासाठी रहिवाश्यांना तेथून हलवून मुंबईमधील इतरत्र नागरी सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी त्यांचे पुनर्वसन करावे. तसेच एम.पी.सी.बी.चा अभ्यास एन.जी.टी. ची केस पूर्ण होई पर्यंत तेथे अजून कोणतीही पी.ए.पी. स्थलांतरीत करण्यास त्वरीत स्थगिती द्यावी. तसेच माहूल येथील उद्योगधंदे व रिफायनरीमुळे वाढते वायु प्रदुषण रोखण्यासाठी आपण या प्रदुषणाबाबतची सखोल माहिती मागवून घ्यावी व कायमस्वरुपी कोणते उपाय व त्यानुषंगाने पर्यायी अंमलबजावणी करता येर्ईल याबाबत तात्काळ निर्णय घ्यावा. तसेच माहुल गांव येथे वायु प्रदुषण करणाऱ्या रिफायनरी कंपन्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी आमदार, मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी पत्रा द्वारे केली आहे.

मुंबईसह महाराष्ट्रातील नागरीकांच्या निरोगी आरोग्य विषयक उपाययोजनाकरीता आपले सरकार सदैव हितकारक निर्णय व त्यानुषंगाने अंमलबजावणी करीत असल्याने निश्चितच माहूल गावातील नागरिकांना मुंबईतच अन्यत्र त्यांचे पुनर्वसन करावे, म्हणजे त्यांना स्थिरता मिळू शकेल. अशी मागणी देखील त्यांनी आपल्या पत्रात केली आहे.