मुंबईकरांचा प्रवास होणार सुरक्षित

0

लोकलच्या दरवाज्यावरील सेफ्टी सेन्सर अपघात टाळणार

मुंबई : आर्थिक राजधानी मुंबईची लाइफलाइन लोकल आता आणखी अपग्रेड होणार आहे. मुंबईतील सातत्याने वाढणारी लोकसंख्या, त्यामुळे लोकल वाहतुकीवर पडणारा प्रचंड ताण आणि त्यातून होणारे जीवघेणे अपघात, यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न रेल्वे मंत्रालय करत आहे. गर्दीच्या वेळी गाडी पकडण्याच्या नादात तोल जाऊन आतापर्यंत अनेकांना हकनाक प्राण गमवावे लागले आहेत. असे यापुढे घडू नये याकरता रेल्वे मंत्रालयाने लोकल डब्ब्यांच्या दरवाजांवर सेफ्टी सेन्सर लावण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे रेल्वे चालू होण्याचा सिग्नल प्रवाशांना मिळेल. त्यामुळे ते गाडी पकडण्याची घाई करणार नाहीत. केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी रविवारी ही माहिती दिली.

त्यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आणि त्यामध्ये त्यांनी या सेफ्टी सेन्सरची माहिती दिली आहे. ते म्हणाले, मुंबई लोकलच्या डब्बांवर निळ्या रंगाची लाईट लावण्यात येणार आहे. ही लाईट प्रवाशांना ट्रेन सुरू होणार असल्याचे सिग्नल देणार आहे. त्यामुळे लोकलमध्ये चढताना होणार्‍या दुर्घटना कमी होतील. याविषयी पश्‍चिम रेल्वेच्या एका अधिकार्‍याला विचारले असता, त्यांनी हा निर्णय केंद्रात घेतला गेला असेल. आमच्यापर्यंत अशा सूचना आलेल्या नाहीत. त्या आल्यावर त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात येईल, असे सांगितले. दरम्याना गोयल यांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वेकडून कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत, हेही त्यांनी सांगितले.