मुंबई । राज्य सरकारवर उंदीर घोटाळा केल्याचा आरोप ताजा असतानाच एका नवीन घोटाळ्याने तोंड वर काढलं आहे. हे वादळ चहाचं असलं, तरी चहाच्या पेल्यात शमणारं नाही! मुख्यमंत्री कार्यालयात चहा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला आहे.
मुख्यमंत्री कार्यालयात 2015-2016, 2016-2017 आणि 2017-2018 मध्ये चहा आणि अल्पोपहारावर केलेला खर्च हा दरवर्षी दुपटीहून अधिक झाल्याकडे संजय निरुपम यांनी लक्ष वेधलं. माहितीच्या अधिकारा अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार 2015-2016 साली सीएमओमध्ये चहा आणि अल्पोपहारावर 57 लाख 99 हजार 156 रुपये खर्च झाला होता. तो खर्च 2016-2017 मध्ये एक कोटी 20 लाख 92 हजार 972 रुपयांवर पोहचला. त्यानंतर 2017-2018 वर्षात तर चहा आणि अल्पोपहारावर तीन कोटी 34 लाख 64 हजार 905 रुपये खर्च झाला.
हा निष्कर्ष पूर्णतः चुकीचा
हा निष्कर्ष पूर्णत: चुकीचा असल्याचा दावा सीएमओने केला आहे. हा केवळ चहापानाचा खर्च नसून त्यात चहापान, नाश्ता, जेवण, मंत्रिमंडळ बैठकींसाठी होणारा नाश्ता, सत्कारासाठी लागणारे पुष्पगुच्छ, शाल-श्रीफळ, भेटवस्तू, सर्व प्रकारच्या आणि विविध विभागांच्या बैठका, शिष्टमंडळासाठी होणारा खर्च असा संपूर्ण आतिथ्य खर्च समाविष्ट आहे, असं मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं. हा खर्च केवळ मुख्यमंत्री सचिवालयाचा नसून त्यात मंत्रालय, सह्याद्री अतिथीगृह, वर्षा निवासस्थान, नागपूर येथील रामगिरी निवासस्थान, हैद्राबाद हाऊस या सर्व ठिकाणचा खर्च समाविष्ट आहे, असे मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे.
पाहुण्यांच्या संख्येत वाढ
मंत्रालय आणि मुख्यमंत्री कार्यालयाला भेट देणार्या अलिकडे प्रचंड वाढ झाली आहे. या अभ्यागतांमध्ये सरकारच्या विविध उपक्रमांमुळे देश-विदेशातील शिष्टमंडळे, विविध उद्योगसमुहांची प्रतिनिधी मंडळे, विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या भेटींचा समावेश आहे. यापूर्वी मुख्यमंत्र्यांकडे आयोजित विभागवार बैठकांची देयकं संबंधित विभाग देत असत. आता या बैठकांची देयकं मुख्यमंत्री कार्यालयाकडून दिली जात आहेत. तसंच शासकीय विभागांच्या बैठकांची संख्याही वाढली आहे. त्याचप्रमाणे अतिथ्यखर्चात पुरवण्यात येणार्या जिन्नसांच्या दरातही वाढ झाली आहे, असं मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलं.