मुले पळवणारी टोळी ही तर निव्वळ अफवा : पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड

भुसावळ : शहरात लहान मुले पळविणारी टोळी आल्याच्या अफवा काही जण सोशल मिडीयावर पसरवत असून या अफवांवर कोणीही विश्वास ठेऊ नये तसेच अफवा फैलवणार्‍यांची नावे पोलिस प्रशासनाला कळवावीत, असे आवाहन पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी केले आहे.

अफवा पसरणार्‍यांवर पोलिस करणार कारवाई
गेल्या काही दिवसांपासून व्हॉटसअ‍ॅप, फेसबुक आदी सोशल मिडीयाच्या माध्यमातून लहान मुलांचे अपहरण करणारी टोळी आली किंवा चोर आले अश्या अफवा पसरवल्या जात आहे. अश्या अफवांमुळे अन्य जिल्ह्यात जमावाकडून बहुरूपी, वाटसरू, भिकारी व अन्य निष्पाप लोकांना मारहाण झाली आहे. यातून जमावावर गुन्हे दाखल झाले आहे. अफवा फैलविणारे जर कुणी व्हायरल करीत असल्यास वा अशांची नावे माहिती असल्यास ती नावे पोलिसांना कळवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. लोकांनी कायदा हातात घेऊ नये, कायदा व सुव्यवस्था आबाधीत राहण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी केले आहे.