मुळाणे घाटात नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर कारवर उलटले : जळगाव जिल्ह्यातील सहा ठार

नाशिक : ट्रॅक्टरसह ट्रॉली उलटून कारवर आदळल्यामुळे झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाले आहेत. या अपघातातील मयत आणि जखमी हे पारोळा, जामनेर आणि भडगाव तालुक्यातील रहिवासी असून यातील नऊ जणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

नियंत्रण सुटल्याने उलटले ट्रॅक्टर
रस्त्याच्या कामासाठी मजुरांना घेऊन चाललेल्या ट्रॅक्टरचा गुरुवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. वणी-कळवण रस्त्यावर मुळाणे घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर ट्रॉलीसह कारवर उलटून हा अपघात झाला. सहा मजूर ठार झाले. तर 15 जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह परीसरातील ग्रामस्थांनी धाव घेऊन जखमींना वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

यांचा अपघातात झाला मृत्यू
या अपघातात पारोळा तालुक्यातील उंदीरखेडे येथील पवार कुटुंबातील तीन सदस्य ठार झाले असून पाच जखमी झाले आहेत. हे कुटुंब मजुरी करून आपला उदरनिर्वाह भागवत असे. रस्ते कामासाठी बाहेर जाणार्‍या या कुटुंबावर काळाने घाला घातल्याने सर्वदूर हळहळ व्यक्त होत आहे. सरला आणि वैशाली बापू पवार या चार वर्षांच्या जुळ्या मुलींसह पोपट गिरीधर पवार (40) तर पारोळा तालुक्यातीलच अंजनेरा येथील रामदास बळीराम मोरे (48), आशाबाई रामदास मोरे (40), बेबाबाई रमेश गायकवाड (40) यांचाही मृत्यू झाला.

अपघातात हे नागरीक जखमी
या अपघातात ट्रॉलीतील बापू पवार (45, रा.उंदीरखेडा, ता.पारोळा), सुवर्णा पोपट पवार (13, रा.उंदीरखेडा), विशाल पोपट पवार (11, रा.उंदीरखेडा), आकाश पोपट पवार (15, रा.उंदीरखेडा), सागर रमेश गायकवाड (23, रा.अंजनेरा), सुरेखा अशोक शिंदे (22, रा.हिंगोणा), संगीता पोपट पवार (45, रा.उंदीरखेडा), लक्ष्मण अशोक शिंदे (21, रा.हिंगोणा), तनू दीपक गायकवाड (3, रा.कुसुंबा), दीपक बाबूलाल गायकवाड (30, रा.कुसुंबा), अनुष्का दीपक गायकवाड (1, रा.कुसुंबा), मनीषा दीपक गायकवाड (24, रा.कुसुंबा), गणेश बापू पवार (7, रा.उंदीरखेडा), प्रिया संजय म्हस्के (3, रा.जामनेर), अजय नवल बोरसे (2, रा.मिराड) यांचा समावेश आहे.