मुंबई । मुंबईत 29 ऑगस्ट, 2017 रोजी झालेल्या मुसळधार पावसात मॅनहोलमध्ये पडून बॉम्बे रुग्णालयाचे प्रसिद्ध पोटविकारतज्ज्ञ डॉ. दीपक अमरापूरकर यांच्या झालेल्या मृत्यूनंतर तसेच नोव्हेंबरमध्ये नीलिमा पुराणिक मुलुंडमधील मॅनहोलमध्ये पडून गंभीर जखमी झाल्यानंतरही झोपी गेलेल्या महापालिकेला मॅनहोलला संरक्षक जाळ्या लावण्याची आठवण तब्बल सात महिन्यांनंतर झाली आहे. मुंबईच्या विविध भागांत 1450 जाळ्या लावण्याचे पालिकेने मान्य केले असून, त्यासाठी अखेर निविदा मागवण्यात आल्या आहेत.
मागील वर्षीच्या पावसाळ्यात लोअर परळ येथील दीपक चित्रपटगृहाजवळील मॅनहोलमध्ये पडून डॉ. अमरापूरकर यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी न्यायालयानेही पालिकेवर ताशेरे ओढले. या घटनेपाठोपाठ मुलुंड पश्चिम येथे पुराणिक मॅनहोलमध्ये पडून जखमी झाल्या. या दुर्घटनांमुळे मॅनहोलवरील संरक्षक जाळ्यांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला. याप्रकरणी पालिकेने आठ ते दहा दिवसांत निविदा मागवण्यात येतील, असे आश्वासन नोव्हेंबरमध्ये दिले होते. मात्र त्यास विलंब झाला. मुंबईत सुमारे एक लाखांहून अधिक मॅनहोल आहेत. त्यावर टप्प्याटप्प्याने जाळ्या बसवल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात सुमारे दीड हजार जाळ्या बसणार आहेत. त्यासाठी फेब्रुवारीत निविदा मागवण्यात आल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी दिली.
मॅनहोलवर जाळ्या लावू – महापालिका
मुंबईतील संभाव्य धोक्याचे सुमारे 1500 मॅनहोल लोखंडी जाळी किंवा ग्रीलने आच्छादण्यात येतील, अशी ग्वाही मुंबई महापालिकेने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली. त्यानंतर न्यायालयाने पालिकेला आपला प्रस्ताव आणि त्यानुसार केलेली प्रक्रिया याविषयी दोन आठवड्यांत प्रतिज्ञापत्रावर माहिती सादर करण्याचे निर्देश दिले. गेल्या वर्षी 29 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसामुळे मुंबई जलमय झाली असताना बॉम्बे हॉस्पिटलमधील डॉ. दीपक अमरापुरकर यांचा एलफिन्स्टन रेल्वे स्थानकाजवळच्या परिसरातील एका उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला होता. याप्रकरणी फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनने अॅड. आशीष मेहता यांच्यामार्फत जनहित याचिका करून पालिकेला आवश्यक उपाय योजण्याचे निर्देश देण्याची विनंती केली आहे. याविषयी न्या. शंतनू केमकर व न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत पालिकेतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी माहिती दिली की, या गंभीर घटनेनंतर मुंबईतील संभाव्य धोक्याचे मॅनहोल निश्चित करण्यात आले आहेत. त्याप्रमाणे सुमारे पंधराशे मॅनहोलवर लोखंडी जाळी किंवा ग्रील लावण्याच्या कामासंदर्भात निविदाप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
मुंबईत पालिकेकडून मॅनहोल कुठेही उघडे ठेवले जात नाही किंवा दुर्लक्षित केले जात नाही. मुंबईतील पुराच्या वेळी साठलेल्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी काही स्थानिकांनी मॅनहोलवरील झाकण स्वत:हूनच उघडले होते. त्यामुळे डॉ. अमरापुरकर यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित व्यक्तींविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंदवला आहे, अशी माहितीही साखरे यांनी खंडपीठाला दिली. अखेरीस आपल्या उपायांविषयीची सर्व माहिती दोन आठवड्यांत प्रतिज्ञापत्रावर मांडण्याचे निर्देश देऊन खंडपीठाने सुनावणी तहकूब केली.