मोदींनी लोकसभा निवडणुकीत तिरस्काराचे विष पसरविले: राहुल गांधी

0

वायनाड: कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा राजकारणात सक्रीय झाले आहे. कालपासून ते केरळमधील वायनाड मतदार संघाच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान आज त्यांचा रोड शो झाला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात तिरस्कार आणि विभाजनाचे विष पसरवले असा गंभीर आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.

या दौऱ्या दरम्यान त्यांनी आज लोकांशी संवाद साधला. वायनाड या ठिकाणाहून राहुल गांधी खासदार म्हणून निवडून आले आहेत. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात कठोर शब्द वापरले. मात्र त्यांनी विभाजन आणि तिरस्कार या दोन गोष्टींचे विष पसरवले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकांशी खोटे बोलून निवडणूक जिंकले असाही आरोप राहुल गांधी यांनी केला.

वायनाडमधल्या मतदारांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. तसंच वायनाडच्या प्रत्येक नागरिकासाठी काँग्रेस पक्षाचे दरवाजे सदैव उघडे आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. वायनाडच्या माणसाचं वय काय? त्यांची विचारधारा काय? याचा विचार आम्ही करणार नाही त्यांना सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासनही राहुल गांधी यांनी दिले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी वायनाडच्या कालपेट्टा या ठिकाणी रोड शो केला त्यानंतर लोकांशी संवाद साधत असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.