जळगाव। विद्यार्थी दशेत आपले ध्येय निश्चित करा आणि हे ध्येय गाठताना अपयश पदरी पडले तरी या अपयशाची पर्वा न करता सतत प्रयत्न करीत राहा यश निश्चितच प्राप्त होईल. मात्र यश प्राप्त झाल्यानंतर डोक्यात यशाची हवा भिनू देऊ नका, असा सल्ला नवी दिल्लीच्या विज्ञान प्रसार विभागाच्या प्रकल्प संचालक डॉ.इरफाना बेगम यांनी दिला.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने संलग्नित महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या पदवी स्तरावरील विद्याथ्र्यांसाठी या वर्षापासून प्रथमच 1 ते 10 जून दरम्यान संशोधन वृध्दी जोपासण्यासाठी उन्हाळी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन करताना डॉ.बेगम बोलत होत्या.
ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा
डॉ.इरफाना बेगम म्हणाल्या की, अनेक नामवंत शास्त्रज्ञांना विज्ञानाचे प्रयोग करताना प्रारंभीच्या काळात अपयश प्राप्त झालेले आहे. एडीसन, डॉ.रघुनाथ माशेलकर यांचे उदाहरण देवून डॉ.बेगम म्हणाल्या की , या व्यक्तींनी जिद्द सोडली नाही. पदवीच्या विद्यार्थ्यांनी आपले ध्येय या वयात निश्चित करायला हवे. ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा. आज अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग करणारी असंख्य मुले पौसा आणि ओळखी अभावी दुर्लक्षित आहेत. तेव्हा आपण मिळालेल्या या संधीचा उपयोग करा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत विज्ञान प्रसार कार्यालयाकडून विज्ञानाच्या प्रसारासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.
नव्या संशोधनाची जिद्द बाळगा
अध्यक्षीय भाषणात कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी विद्याथ्र्यांमध्ये पदवी स्तरावरच संशोधनाची आवड निर्माण व्हावा, आवडीच्या विषयाचा शोध घेता यावा आणि त्यांच्या संशोधनाच्या कल्पनांना अवकाश प्राप्त व्हावे यासाठी ही कार्यशाळा प्रथमच आयोजित केली जात आहे असे सांगून संशोधनामुळे मन संवेदनशील होते. तेव्हा आपल्या समाजासाठी, गावासाठी काही तरी नवे संशोधन करण्याची जिद्द बाळगण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना उद्देशून केले.
विद्यार्थ्यांचा सहभाग
शास्त्रज्ञ डॉ.रश्मी चावला यांनी यावेळी विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना गांर्भियाने घ्या. कारण आपला दृष्टीकोन हा आपल्याला शिकवत असतो. खूपदा सहजपणे शिक्षणाकडे बघीतले जाते आणि त्याचे परिणाम भोगावे लागतात. तेव्हा गांर्भियाने शिकण्याचे आवाहन आपल्या भाषणात केले. प्रभारी कुलसचिव प्रा.ए.बी.चौधरी यांनी या प्रकारच्या कार्यशाळेतून चांगले वौज्ञानिक निर्माण होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रारंभी कार्यशाळेचे समन्वयक डॉ.एस.टी.बेंद्रे यांनी प्रास्ताविकात आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.आर.बी.गोरे यांनी केले. डॉ.अजय पाटील यांनी आभार मानले. 10 जून पर्यंत ही कार्यशाळा सुरु राहणार असून यामध्ये तीनही जिल्हयातील संलग्नित महाविद्यालयातील 50 विद्यार्थी सहभागी झाले आहेत.