मुख्याध्यापकांना कारणे दाखवा : पोषण आहार अधीक्षकांनी केला धान्य गोदामाचा पंचनामा
यावल- जिल्ह्यात पोषण आहार घोटाळा गाजला असताना शहरातील साने गुरूजी विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी पाठवण्यात आलेल्या मध्यान्ह भोजनाच्या धान्यात अळ्या व कीटक आढळल्याने जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी करून दोषींवर कारवाई करावी, अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली आहे. शिक्षण समितीच्या सदस्या नगरसेविका रूख्माबाई भालेराव-महाजन, गटनेता राकेश कोलते यांनी बुधवारी शाळेत जावून पाहणी केली असता हा गंभीर प्रकार उघडीस आला. शालेय पोषण आहार अधीक्षक गणेश शिवदे यांनी शाळेला भेट देत धान्य ठेवलेल्या गोदामाचा पंचनामा केला. या गंभीर प्रकारानंतर मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.
विद्यार्थी संख्येपेक्षा जास्त आढळला धान्य साठा
नगरपालिका संचलित साने गुरूजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. विद्यार्थ्यांना शाळेत मध्यान्ह भोजन दिले जाते व शासनाच्या शिक्षण विभागाकडून धान्य पुरवठा केला जातो. विद्यार्थ्यांना मिळणार्या भोजनाचा दर्जा चांगला आहे वा नाही? याची पाहणी करण्याकरीता पालिकेच्या शिक्षण समितीच्या सदस्या नगरसेविका रूख्माबाई भालेराव-महाजन व गटनेता राकेश कोलते यांनी बुधवारी शाळेची पाहणी केली. धान्य साठवण केलेल्या गोदामाची पाहणी केली असता तेव्हा मोठ्या प्रमाणात धान्य साठवण केलेले आढळून आले. धान्यात मोठ्या प्रमाणात अळ्या आणि कीटक आढळून आले.
हा जुना धान्य साठा -मुख्याध्यापक बोरोले
मुख्याध्यापक टी.सी.बोरोले यांनी सांगितले की, धान्याचा हा जुना साठा आहे. याबाबत शिक्षण विभागास सूचीत करण्यात आले आहे. परंतु शाळेत क्षमतेपेक्षा जास्त साठा आढळून आल्याने नित्कृष्ट धान्य व क्षमतेपेक्षा जास्त असल्याची तक्रार शिक्षण विभागास करण्यात आली आहे. पोषण आहार अधिक्षक गणेश शिवदे यांनी शाळेवर दाखल होत गोदामाचा पंचनामा केला. याबाबत मुख्यध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
हा तर विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ -रूख्माबाई भालेराव
काही वर्षांपूर्वी राज्यातील काही शाळांमध्ये मध्यान्ह भोजनात विद्यार्थ्यांना विष बाधा झाल्याने खळबळ उडाली होती तेव्हा आपणदेखील पालिकेच्या या शाळेत पाहणी केली असता येथे क्षमतेपेक्षा जास्त धान्य साठा व तोदेखील अळ्या आणि कीड लागलेला दिसून आला. असे निकृष्ट अन्न शिजवून विद्यार्थ्यांना दिले जाते हा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ आहे, अशी संतप्त प्रतिक्रीया रूख्माबाई भालेराव यांनी व्यक्त केली. दरम्यान, अतिरिक्त साठ्याची चौकशी करण्यात येणार आहे. तोपर्यंत शाळेचे गोदाम सील करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.