मुंबई – भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजपा-सेना युतीबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले. तसेच युतीसंदर्भातील निर्णयाला कुठलीही कालमर्यादा नसते, गेल्या वेळेस २ दिवस अगोदर आमची युती तुटली. त्यामुळे अद्याप केवळ चर्चा सुरू आहे, पण कुठलाही प्रस्ताव भाजपाकडून शिवसेनेला देण्यात आला नाही, असे स्पष्टीकरण दानवे यांनी दिले आहे.
शिवसेना भाजपा युतीबाबत अद्याप तळ्यात-मळ्यात अशी स्थिती आहे. शिवसेनेने यंदा स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या बोलण्यावरून अजिबात युती होणार नसल्याचे दिसून येते. भाजपाने ४८ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला असून स्वबळाची तयारी केल्याचे समजते. शिवसेनेला युतीबाबतचा अद्याप प्रस्ताव दिलेला नाही, प्रस्ताव देऊन लवकरच बोलणी सुरू होईल, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.