धुळ्याच्या सभेत राहुल गांधी यांचे विचार ; सत्तेत आल्यास किमान उत्पन्नाइतकी रक्कम खात्यात जमा करणार
धुळे- नरेंद्र मोदी सरकार 24 तासात 450 युवकांना तर चायना सरकार 50 हजार युवकांना रोजगार देते त्यामुळे अशी स्थिती भारतात होण्यासाठी काँग्रेस सरकार हाच सक्षम पर्याय आहे, काँग्रेस सरकार सत्तेत आल्यानंतर देशातील सर्व गरीब नागरीकांच्या खात्यात किमान उत्पन्नाएव्हढी रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल, अशी घोषणा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी धुळे येथील एस.एस.व्ही.पी.एस.महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित जाहीर सभेत केली. सभेच्या सुरुवातीलाच उपस्थितांना नमस्कार, अशी साद घालून त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. अर्ध्या तासाच्या भाषणात त्यांनी मोदी सरकारवर सडकून टिका केली.
चौकीदारावर सडकून टिका
पाच वर्ष मोदी सरकारने देशाचे वाया घातले असून जमीन बिल अधिग्रहणासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला मात्र हे बिल तीन वेळा रद्द करण्यासाठी चौकीदारांनी पुढाकार घेतला, असे राहुल गांधी म्हणाले. मोदींनी दोन हिंदुस्तान तयार केले असून गरीब, बेरोजगार, युवकांचा एक तर दुसरा अनिल अंबानी, मोदी व उद्योजकांचा असल्याचे ते म्हणाले.
काँग्रेसची विचारधारा प्रत्येकाच्या रक्तात असून देशात सर्वाधित मोठा मुद्दा रोजगाराचाअसून काँग्रेस शेतकर्यांसोबत असल्याचे ते म्हणाले.
आता मेड ईन महाराष्ट्र, इंडिया म्हणा
शर्टासह, बुट, मोबाईल मेड ईन चायना येथून येतात मात्र आता आपल्याला चीनची बरोबरी करावी लागणार असून मेड ईन इंडिया, मेड इन महाराष्ट्र होण्यासाठी काँग्रेस हाच सक्षम पर्याय असल्याचे ते म्हणाले. मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानात सत्ता येताच आश्वासनाची पूर्ती करीत आमच्या मुख्यमंत्र्यांनी अवघ्या दोन दिवसांत कर्जमाफी लागू केली, याची आठवण राहुल गांधी यांनी करून देताना काँग्रेसची विचारधारा देशाला आणि समाजाला जोडण्याची असल्याचे सांगत ही विचारधारा महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे. काँग्रेसची सुरुवात महाराष्ट्रातून झाली आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो.ख असे सांगून राहुल गांधी यांनी आम्ही राज्यात राष्ट्रवादीसोबत लोकसभा निवडणूक लढवित असल्याचे सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची आश्वासने हवेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी जेथे जातात तेथे आश्वासन देतात, कुठल्याही आश्वासनांची अद्याप पूर्ती झालेली नाही तसे असेल तुम्ही मला त्याचा पुरावा द्यावा, असे सांगून राहुल गांधी यांनी मेक ईन इंडिया, स्टार्ट अप इंडियावर सडकून टिका केली. धुळ्याच्या सभेतही दोन कोटी युवकांना रोजगार देण्याची मोदी यांनी घोषणा केली मात्र प्रत्यक्षात वर्षाला केवळ एक लाख युवकांना रोजगार मिळत असल्याची कबुली त्यांच्याच सरकारच्या मंत्र्यांनी लोकसभेत दिल्याचे ते म्हणाले.
अंबानींना कागदाचेही विमान येत नाही
राफेल विमानाच्या खरेदीवरून उद्योजक अनिल अंबानींवर राहुल गांधी यांनी सडकून टिका केली. साधे कागदाचेही ते विमान बनवू शकत नाही अशा अंबानींसाठी दहा दिवस आधी कंपनी उघडण्यात आली व त्यांना कंत्राट देण्यात आल्याचा आरोप गांधी यांनी करीत अनिल अंबांनींनी 45 हजार कोटींचे कर्ज घेतले तर एचएलने सरकारला तीन हजार कोटी परत केल्याचे म्हणाले. फ्रान्सचे राष्ट्रपतींनी मोदींनी अंबानींना कंत्राट देण्याचे सांगितले असल्याचे कबुली दिल्याचे ते म्हणाले.
नोटबंदीवर सडकून टिका
राहुल गांधी यांनी मोदी सरकारने केलेल्या नोटबंदीवर टिका करताना ईमानदार लोक रांगेत उभे होते मात्र अनिल अंबानी, नीरव मोदी, ललित मोदी, मेहुल चौक्सी, विजय मल्ल्या रांगेत दिसले नाहीत कारण ते एसी कॅबीनमध्ये बसून व्यवहार करीत असल्याचे ते म्हणाले. 15 उद्योजकांना साडेतीन लाख कोटींचे कर्ज माफ केले जाते मात्र शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात आली नसल्याचे ते म्हणाले.
यांची व्यासपीठावर होती उपस्थिती
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी खासदार मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण , विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव गावीत, रोहिदास पाटील, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, अमरीशभाई पटेल, शाम सनेर, युवराज करनकाळ यांच्यासह प्रमुख पदाधिकारी सभेला उपस्थित होते.