सोमवार, 7 ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमा तसेच रक्षाबंधन आहे. भारतीय संस्कृतीत प्रमुख सणामध्ये ’रक्षाबंधन’ हा सण भाऊ-बहिणीचा स्नेह व उत्सवाचे पर्व म्हणून साजरा केला जातो. देशभरात या सणाची वेगवेगळ्या नावाने ओळख आहे. उत्तर भारतात ’कजरी-पौर्णिमा’, पश्चिम भारतातात ’नारळी पौर्णिमा’ या नावाने तो साजरा केला जातो. इंद्र दानवांकडून पराजित झाले होते. तेव्हा त्यांच्या उजव्या हातावर त्यांची पत्नी इंद्राणीने रक्षासूत्र बांधले होते. त्याने इंद्रदेवाचा आत्मविश्वास वाढला होता. त्यानंतर त्यांनी दानवावर विजय मिळवला होता, अशी पौराणिक कथा आहे तसेच महाभारतात श्रीकृष्णाच्या हाताच्या बोटाला जखम होऊन त्यातून रक्त वाहत होते. तेव्हा पांडवांची पत्नी द्रौपदीने आपल्या साडीची किनार फाडून श्रीकृष्णाच्या बोटाला बांधून दिले होते. तेव्हापासून श्रीकृष्णाने द्रोपदीचे रक्षण करण्याचा संकल्प केला होता व आजीवन त्यांनी दौपदीचे रक्षण केले.
भारतीय इतिहासात रक्षाबंधनसंदर्भात अनेक उदाहरणे आहेत. चित्तौडगडची राणी कर्मावतीने बहादूरशाहपासून स्वत:ची रक्षा करण्यासाठी मुघल हुमायूला राखी बांधल्याचे उदाहरण आहे. हुमायूने राणीच्या रक्षणासाठी प्राणाची बाजी लावली होती. नोबल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी बंगाल विभाजनानंतर हिंदू व मुस्लीम यांच्यात सलोखा निर्माण करण्यासाठी दोन्ही समुदायांना एकमेकांच्या हातावर रक्षासूत्र बांधण्याची विनंती केली होती. पौराणिक कथा व इतिहात चाळता रक्षाबंधन या सणात काळानुरूप बदल झालेला आढळतो. आता तर हे पर्व भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याचे, प्रेमाचे, स्नेहाचे व बंधनाचे पर्व म्हणून देशात साजरे होताना दिसते. त्यात बहीण आपल्या भावाच्या उजव्या हातावर राखी बांधत असते व भाऊ आपल्या लाडक्या बहिणीच्या रक्षणाचे दायित्त्व स्वीकारत असतो.काळ बदलला असला तरी आज माहिती तंत्रज्ञानाच्या युगात भाऊ-बहिणींच्या स्नेहाचा ’रक्षाबंधन’ या सणाचे महत्त्व कायम आहे.
राख्यांमधील लहरींचा बहीण व भाऊ या दोघांना फायदा होतो. त्यामुळे दिखाऊ राख्या घेण्यापेक्षा ईश्वरीतत्त्व टिकवून ठेवणार्या राख्या घेतल्या पाहिजेत, अन्यथा त्या राख्यांमधील त्रिगुणांचा जिवांवर परिणाम होऊन त्यांची तशी वृत्ती बनण्यास मदत ठरते. श्रीकृष्णाच्या बोटातून वाहणार्या रक्तप्रवाहाला थांबवण्यासाठी द्रोपदीने तिच्या साडीचा पदर फाडून त्याच्या बोटाला बांधला. बहीण भावाला होणारा त्रास कदापी सहन करू शकत नाही. त्याच्यावर आलेले संकट दूर करण्यासाठी ती काहीही करू शकते. राखी पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक बहिणीने भावाला राखी बांधताना हाच भाव ठेवला पाहिजे. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावाकडून वस्तूच्या रूपात कोणतीही अपेक्षा मनात बाळगल्यास ती त्या दिवशी मिळणार्या आध्यात्मिक फायद्यापासून वंचित राहते. हा दिवस आध्यात्मिकदृष्ट्या देवाण-घेवाण हिशोब कमी करण्यासाठी असतो. अपेक्षा ठेवून वस्तूची प्राप्ती केल्यास देवाण-घेवाण हिशोब 3 पटीने वाढतात. या दिवसाची आठवण ठेवून बहीण-भावाचे बंधन अतूट ठेवण्याचा प्रयत्न करणे, समाजातील इतर जीवांशी अतूट बंधन ठेवण्याचा प्रयत्न करणे व ईश्वरावरील श्रद्धा वाढवण्याचा प्रयत्न करणे.
सपना ठाकूर – कांजूरमार्ग