मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत शाहरुख खानचे मत
मुंबई : देशात दरवर्षी 1000 चित्रपट तयार होतात, ते 45 देशांमध्ये प्रदर्शित होतात. पण तरीही आपल्याकडे हॉलिवूडचा धाकटा भाऊ म्हणून पाहिले जाते. हे चित्र नक्कीच बदलता येईल. त्यासाठी बॉलिवूड, टीव्ही, वेब, वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांनी एकत्र येणे आणि महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने राज्यात मीडिया हब तयार करणे गरजेचे आहे, असे मत बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खान याने मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत व्यक्त केले. तो मीडिया ः शेपिंग द फ्युचर ऑफ इन्फॉर्मेशन अँड एन्टरटेन्मेंट या विषयावरील चर्चासत्रात बोलत होता.
मीडिया वेगाने वाढणारे क्षेत्र
या चर्चासत्रात बॉलिवूड दिग्दर्शक रितेश सिधवानी, व्हायकॉम 18चे ग्रूप सीईओ सुधांशू वत्स, रिपब्लिक टीव्हीचे व्यवस्थापकीय संचालक अर्णब गोस्वामी, लोकमत मीडियाचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा आणि अॅमेझॉन प्राइम व्हिडीओचे कन्टेंट हेड विजय सुब्रमण्यम हेही सहभागी झाले होते. मीडिया हे क्षेत्र वेगाने वाढत असून, त्यातून रोजगाराच्या मोठ्या संधीही निर्माण होत आहेत. त्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याची ताकद मीडियामध्ये असल्याचा विश्वास सर्व वक्त्यांनी व्यक्त केला.
मीडियानेही ग्लोबल व्हावे
आपला तरूणांचा देश असून तरुणाईची चव ग्लोबल झाली आहे. त्यामुळे दिल है हिंदुस्थानी हे खरे असले तरी मीडियानेही ग्लोबल व्हायला हवे. आपल्याकडे नव्या कल्पना, नवे विचार आहेत. त्याच्या जोडीला अद्ययावत तंत्रज्ञानही आहे. एकही देश असा नाही जिथे भारतीय माणूस पोहोचलेला नाही. त्याच्यापर्यंत आपण पोहोचले पाहिजे. त्याचवेळी देशात थिएटर्सची संख्या वाढवण्याची गरजही आहे. देशाची लोकसंख्या सव्वाशे कोटीहून अधिक असताना फक्त 3 कोटी जणांनीच दंगल पाहिला, इतरांना तो पाहायचा नव्हता असे नाही, पण त्यांच्यापर्यंत तो पोहोचूच शकला नाही, असे शाहरूखने निदर्शनास आणून दिले.