राज्यावर पुन्हा गारपिटीचे सावट

0

हवामान खात्याचा अंदाज

नाशिक : उत्तर महाराष्ट्रावर पुन्हा एकदा गारपिटीच्या संकटाचे सावट घोंगावू लागले आहे. 23 फेब्रुवारीदरम्यान उत्तर महाराष्ट्रात गारपीट होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या इशार्‍यानंतर नाशिकचे जिल्हा प्रशासनही सतर्क झाले आहे. मागील आठवड्यात हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज खरा ठरला होता. या गारपिटीमुळे मराठवाडा विदर्भातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले होते. अजूनही त्या गारपिटीतून शेतकरी सावरला नसताना आता गारपिटीचे दुसरे संकट येऊन ठेपले आहे.

शेतकरी चिंतेत पडला
शेतकर्‍यांनी पिकांची काळजी घ्यावी, पिके उघड्यावर सोडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. गेल्या आठवड्यात मराठवाड्यासह विदर्भात गारपिटीने खूप मोठे नुकसान झाले हाते. गेल्या आठवड्यातील अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 11 जिल्ह्यातील सुमारे 50 तालुक्यांमधील 1086 गावांमधील 1 लाख 24 हजार 294 हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. यामध्ये गहू, हरभरा, ज्वारी, कांदा आणि रब्बी हंगामामधील फळ पिकांना मोठा फटका बसला होता. जालना जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला होता. त्यानंतर पुन्हा उत्तर महाराष्ट्रात गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे.