पुणे- अयोध्येत राम मंदिर उभारणीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राम मंदिर उभारण्यासाठी मागील कित्येक वर्षांपासून विहिंपकडून लढा आणि आंदोलन उभारले गेले आहे. अजूनही राम मंदिराची निर्मिती झालेली नाही. आता आम्ही काय जागतिक संघटनेकडे राम मंदिराच्या निर्मितीची मागणी करायची का? असा खोचक सवाल विश्व हिंदू परिषदेने उपस्थित केला आहे. विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय मंत्री शंकर गायकर यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. हिंदूंना राम मंदिरासाठी कायदा हवा असेही त्यांनी सांगितले आहे.
देशभरात धर्म सभेचे आयोजन करण्यात आले असून पुण्यात विराट धर्मसभेचे ९ डिसेंबर २०१८ रोजी धर्म सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत कागशिला पिठाधिश्वर महंत साध्वी प्रज्ञा भारतीय, अतुलशास्त्री भगरे गुरुजी, विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष हुकूमचंदजी सावला हे उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत. जर सरकारने राम मंदिरासाठी कायदा न केल्यास देशभरात त्याचे पडसाद उमटणार असल्याचे शंकर गायकर यांनी सांगितले.