सातारा:- भारत-चीन मुद्द्यावरून काँग्रेस पक्ष मोदी सरकारवर टीका करत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे कान टोचले आहेत. राष्ट्राच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर आरोप करताना पूर्वी काय घडले होते याचा विचार करायला पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. तसेच राष्ट्राच्या संरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण करू नका असेही त्यांनी सांगितले.
१९६२ च्या युद्धानंतर चीनने भारताच्या ४५ हजार किलोमीटरचा भूभाग बळकावला होता. तो आजही परत मिळाला नसल्याची आठवण त्यांनी करून दिली. तसेच काल परवा झालेल्या भारत-चीन संघर्षात चीनने आपला काही भूभाग बळकावला होता तो नेमका किती बळकावला हे माहित नाही असे सांगितले.
साताऱ्याच्या दौऱ्यावर असताना शरद पवारांनी पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. चीन-भारत प्रश्न हा संवेदनशील आहे. चीनने गलवान खोऱ्यात कुरापत काढली हे खरे आहे, मात्र भारत चीन युद्ध होण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी सांगितले.