पुणे । भजन, गझल, चित्रपट संगीत अशा सर्वच संगीताच्या मुळाशी शास्त्रीय संगीत आहे. शास्त्रीय संगीताला दाद देणारे रसिक आपल्यातील गायक जिवंत ठेवतात. अशा रसिकांना उत्तम शास्त्रीय संगीत अनुभवता यावे, यासाठी आपण नियमित रियाज, कठोर मेहनत घेतली पाहिजे, असा सल्ला प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.
डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या (एमआयटीडब्ल्यूपीयू) फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंटतर्फे (पदवी विभाग) संगीतभारती या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. एमआयटी कोथरूडच्या प्रांगणात झालेल्या या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत होत्या. याप्रसंगी आदिनाथ मंगेशकर, एमआयटीचे अधिष्ठाता डॉ. आर. एम. चिटणीस, प्रसन्न हॉलीडेजचे मझहर शेख, बुलढाणा अर्बनच्या मिताली मांढरे, योगिनी पोकळे, संगीतभारतीच्या संयोजिका कल्याणी बेलसरे, प्रा. अंजली साने, प्रा. भिसे आदी उपस्थित होते.
राज्यभरातून 27 स्पर्धकांनी घेतला होता सहभाग
राज्यभरातील एकूण 27 स्पर्धकांनी यात सहभाग घेतला. शास्त्रीय गटात स्वामिनी कुलकर्णी प्रथम, मीता दांडेकर द्वितीय आणि सौरभ पांडे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. उपशास्त्रीय गटात सौरभ पांडे याने प्रथम, मंगेश आबनावे याने द्वितीय तर शीतल गद्रे हिने तृतीय क्रमांक पटकाविला. ललित आफळे यांनी हार्मोनियम, तर वाङ्मय गोडबोले यांनी तबल्यावर साथ दिली.
क्षमता ओळखून मेहनत करा
शालेय-महाविद्यालयीन स्तरावर होणार्या स्पर्धांमधून आपल्यातील कलाकार बहरत जातो. आमच्यावेळी श्रीनिवास खळे, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर यांसारख्या दिग्गजांनी आम्हाला प्रोत्साहित केले. माझ्या वडिलांनी माझ्याकडून सराव करून घेतला. त्यामुळे तुम्ही विद्यार्थ्यांनीही रियाजाला जास्तीत जास्त वेळ देऊन आणि आपल्यातील क्षमता ओळखून मेहनत केली, तर उत्तम शास्त्रीय संगीत सादर करू शकाल, असे आरती अंकलीकर-टिकेकर यांनी सांगितले. शास्त्रीय संगीतातील विविध राग, रागिणी आणि घराणी यामुळे भारतीय संगीत अधिक समृद्ध झाले आहे. कोणत्याही प्रकारचे संगीत शिकण्यासाठी शास्त्रीय संगीताची जाण असणे महत्वाचे असून, त्यासाठी आपण ते आत्मसात केले पाहिजे, असे आदिनाथ मंगेशकर यांनी यावेळी सामगितले. मझहर शेख यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. आर. एम. चिटणीस यांनी प्रास्ताविक केले. शुभम मंत्री आणि प्रतीक कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन तर प्रा. कल्याणी बेलसरे यांनी आभार मानले.