सुनील अग्रवालांविरुद्ध अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून अतिक्रमण हटवण्याची मागणी
भुसावळ- रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी (आठवले गट) यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करणार्या बाजारपेठ पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्यावर कारवाई करावी, सुनील रमेशचंद्र अग्रवाल व ट्रस्टच्या सदस्यांवर अॅट्रासिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा, बनावट कागदपत्र तयार केल्याप्रकरणी 420 चा गुन्हा दाखल करावा आदी मागण्यांसाठी नगरसेविका पूजा राजू सूर्यवंशी व माजी नगरसेविका नंदा प्रकाश निकम यांच्या नेतृत्वात 3 रोजी दुपारी दोन वाजता पंधरा बंगला, बौद्ध विहार भागातून शेकडो महिलांचा मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या संदर्भात प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना 1 रोजी निवेदन देण्यात आले.
आयजी कार्यालयासमोरही होणार उपोषण
पूजा सूर्यवंशी व नंदा निकम यांच्या निवेदनानुसार राजू सूर्यवंशी, प्रकाश निकम यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर सुनील अग्रवाल यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याने त्यांच्यावर अॅट्रासिटीसह 420 कलमान्वये गुन्हा दाखल करावा तसेच कंडारी गट क्रमांक 159/1/2 चे उतारे पहावे व तातडीने अतिक्रमण हटवण्यात यावे, संबंधित अतिक्रमणाची जिल्हाधिकार्यांच्या नेतृत्वात चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. खोटा गुन्हा मागे न घेतल्यास नाशिक आयजी कार्यालयासमोर 10 डिसेंबरपासून आमरण उपोषण छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
नियमानुसारच कारवाई -देविदास पवार
पोलिसांनी नियमानुसार कारवाई केली आहे. न्यायालयाचे जैसे थे आदेश असताना संबंधितानी जागा बळकावण्याचा प्रकार केला असून त्याबाबतचे पुरावे पोलिसांकडे आहेत. पोलिसांकडून नियमांचे पूर्णपणे पालन करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक देविदास पवार यांनी सांगितले.