रोजगारावरून देशातील लोकांमध्ये चिंतेचं वातावरण- आरबीआय

0

मुंबई : नोकऱ्या आणि रोजगारावरून देशातील ४७ टक्के लोकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे अशी धक्कादायक माहिती आरबीआयच्या एका अहवालातून समोर आली आहे. मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी आणि येत्या १२ महिन्यांत रोजगार आणि नोकऱ्यांबाबतीत सुधारणा होईल, असा विश्वास ५२ टक्के लोकांनी दाखवल्याचंही या अहवालामध्ये नमूद करण्यात आलं आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या इंडियन कंझ्युमर कॉन्फिडन्सच्या ताज्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. नोव्हेंबरमध्ये देशातील १३ शहरांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला. ५ डिसेंबर रोजी हा सर्व्हे जारी करण्यात आला. या सर्व्हेनुसार अर्थव्यवस्थेत सुधारणा झाल्याची भावना असणाऱ्या लोकांची संख्या कमी झाल्याचंही उघड झालं आहे. तर ५३.६ टक्के लोकांना अजूनही या परिस्थितीत सुधारणा होणार असल्याचं या सर्व्हेतून दिसून आलं आहे.

सध्याची अर्थव्यवस्था आणि वित्तीय क्षेत्रात जे काही घडत आहे. त्यावर लोकांनी नाराजी व्यक्त केली असल्याचं आकड्यांवरून दिसत आहे. बाजार, अर्थव्यवस्था आणि संस्थांमध्ये होणारे सततचे बदल लोकांच्या पचनी पडत नसतात, असं माजी मुख्य संख्याशास्त्रज्ञ प्रोणब सेन यांनी सांगितलं. तर तेलाच्या घसरत्या किंमती, रुपयाची घसरण आणि त्यामुळे शेअरबाजारात निर्माण झालेली अस्थिर परिस्थिती यामुळे नोकरी आणि अर्थव्यवस्थेशी संबंधित चिंता वाढणं स्वाभाविक असल्याचं स्टेट बँक ऑफ इंडिया समूहाचे मुख्य आर्थिक सल्लागार सौम्य कांती घोष यांनी म्हंटले आहे.