मुंबई – वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठीचा निधी लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय रोजगार हमी विभागामार्फत घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे लाभार्थी त्यांना लागणारे साहित्य स्वत: टीन नंबर असणाऱ्या दुकानदारांकडून खरेदी करू शकणार असल्याने कामांना वेग येईल, अशी माहिती राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल यांनी शुक्रवारी दिली.
सिंचन विहीर, शेततळे, फळबाग लागवड, शौचालय, शोषखड्डे अशा काही वैयक्तिक लाभाच्या योजना रोहयो विभागामार्फत राबविण्यात येतात. यासाठी लागणाऱ्या सिमेंट, वीट, वाळू, स्टील इत्यादी साहित्याच्या खरेदीसाठी लागणारा निधी लाभार्थ्यांना थेट त्यांच्या खात्यावर देण्यात येणार आहे. याआधी वैयक्तिक लाभांच्या योजनांसाठी ग्रामपंचायतींमार्फत साहित्य खरेदी करून लाभार्थ्यांना पुरविले जात होते. शासनाकडून ग्रामपंचायतीमार्फत विक्रेत्यास निधी देण्यात येत होता. मात्र, विक्रेत्यांकडून शेतकरी लाभार्थ्यांना लाभ प्रदान करण्यास विलंब होत होता. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे साहित्य खरेदीसाठीचे कुशल पेमेंट थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. यासाठी लाभार्थ्यालाच वेंडर म्हणून नियुक्त करण्याचा मानस आहे. लाभार्थ्याने स्वखर्चाने साहित्य खरेदी केल्यानंतर त्याचे देयक ग्रामरोजगार सेवकाकडे जमा करावे. त्यानंतर सात दिवसांच्या आत या देयकांची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे, असेही ते्यांनी स्पष्ट केले.
रोहयोचे ई- मस्टर आता ग्रामपंचायत स्तरावर मजूरांची मागणी व काम सुरू करण्यामध्ये होत असलेल्या वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी ई – मस्टर आता तालुका स्तराऐवजी ग्रामपंचायत स्तरावरूनच काढण्याचा निर्णयही रोहयो विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे मजुरांना आपली मजुरी वेळेत मिळणार असल्याचेही रावल यांनी सांगितले. या विकेंद्रीकरणामुळे तालुका स्तरावरील कामाचा ताणही कमी होणार असल्याचे ते म्हणाले.