बारामती- सातार्यातील मांढरदेवी गडावर अख्ख्या कुटुंबाने विषप्राशन केल्याच्या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. आरोपीने स्वतःच्याच कुटुंबीयांना विष पाजल्याचा प्रकार समोर आला असून यात एका तरुणाचा मृत्यू झाला असून आरोपी वडीलच निघाले असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
विष्णू चव्हाण असे अटक करण्यात आलेल्या वडिलांचे नाव असून बुधवारी (दि. 26) या घटनेत स्वप्नील चव्हाण याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी दिलेली माहितीनुसार विष्णू चव्हाणने आपल्या कुटुंबावर करणी झाल्याचे अख्ख्या कुटुंबाला सांगितले. करणी उतरवायची असल्यास सातार्यातील मांढरदेवी गडावर जाऊन अमृत प्यावे लागेल, अशी बतावणी त्याने केली. त्यानंतर अमृताच्या नावाखाली आरोपीने आई, पत्नी आणि मुलांना विष पाजले. विष्णू चव्हाणने हे कृत्य का केले, याचे कारण अद्याप उलगडलेले नाही. सुरुवातीला चव्हाण कुटुंबाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची शक्यता निर्माण झाली होती. या घटनेत स्वप्नील चव्हाण या तरुणाचा मृत्यू झाला. तर तृप्ती विष्णू चव्हाण, प्रतिक्षा चव्हाण, सुनिता विष्णू चव्हाण, मुक्ताबाई नारायण चव्हाण सुदैवाने बचावल्या आहेत. विषप्राशन केलेल्या तिघांवर सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात, तर दोघांवर वाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत.