मुंबई-श्रीनिवास वनगांसाठी आमचे दरवाजे कायम खुले आहेत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. पालघर निवडणुकीच्या निकालानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर ते बोलत होते. ज्याप्रकारे निवडणूक झाली ते क्लेषदायी होती अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. मित्रपक्षाने आमच्याच नेताच्या मुलाला आमच्याविरोधात उभे केले. यामुळे आमच्यात थोडा कडवटपणा निर्माण झाला होता. भविष्यात असे होऊ नये यासाठी प्रयत्न असेल असे त्यांनी सांगितले.
ईव्हीएममध्ये झालेल्या बिघाडाची निवडणूक आयोगाने दखल घेतली पाहिजे अशी मागणी यावेळी त्यांनी केली. आमचा सुशिक्षत मतदार सकाळी पहिल्यांदा मतदानासाठी जातो. पण ईव्हीएम बंद असल्यावर परतलेला तो पुन्हा येत नाही त्यामुळे आमचं नुकसान होते असे त्यांनी सांगितले. ईव्हीएम बिघाडाचा भाजपाला मोठ्या प्रमाणात फटका बसला असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
काहीजण आम्हीच ईव्हीएमची निर्मिती केल्याप्रमाणे टीका करतात अशी खंत त्यांनी व्यक्त केली. निवडणूक आयोग स्वतंत्र आहे असे त्यांनी सांगितले. भंडारा गोंदियमध्ये झालेल्या पराभवाच्या कारणांवर आम्ही चर्चा करु. २०१९ मध्ये या जागा आम्ही मोठ्या फरकाने जिंकू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. युतीसाठी शिवसेनेने पुढाकार घ्यावा. आम्ही चर्चेसाठी कधीच नकार दिलेला नाही, चर्चेसाठी आम्ही नेहमीच तया आहोत असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. शिवसेना दुसऱ्या कोणत्या पक्षासोबत जाईल असं वाटत नसल्याचंही त्यांनी सांगितलं. ईव्हीएममध्ये गडबड असती तर आम्ही देशातल्या सगळ्या निवडणुका जिंकल्या असत्या. कर्नाटकात १०४ वर कशाला थांबलो असतो. पालघर जिंकलो आणि भंडारा-गोंदिया हारलो असं कशाला केलं असतं असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विचारला.