वरणगाव : सहा महिन्यांपूर्वी झालेल्या वादाच्या कारणावरून चौघांनी 25 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना शहरातील डॉ.आंबेडकर नगराजवळील महालक्ष्मी सॉल मिलजवळ सोमवारी रात्री 10.15 वाजेच्या सुमारास घडली होती. टोळक्याने केलेल्या हल्ल्यात सचिन जीवराम मगरे (25, आंबेडकर नगर, वरणगाव) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर दोघा आरोपींना अटक करण्यात आली. मंगळवारी आरोपींना भुसावळ न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची (11 जूनपर्यंत) पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
धारदार शस्त्रांचे वार केल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
सोमवारी रात्री 10.15 वाजेच्या सुमारास सचिन जीवराम मगरे (25, आंबेडकर नगर, वरणगाव) हा डॉ.आंबेडकर नगराजवळील महालक्ष्मी सॉल मिलजवळ चौघा आरोपींनी खून केला होता. या प्रकरणी भीमराज जीवराज मगरे (27, डॉ.आंबेडकर नगर, वरणगाव) यांच्या फिर्यादीनुसार संशयीत आरोपी राहुल गजानन कदम (24), अक्षय संजय भैसे (23), अजय रवींद्र तायडे (21) व अन्य एकाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. राहुल, अक्षय यांना अटक करण्यात आल्यानंतर मंगळवारी भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले असता 11 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, रात्री उशिरा अजय तायडे यासदेखील अटक करण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. तपास सहा.निरीक्षक संदीपकुमार बोरसे करीत आहेत.