नवापूर: तालुक्यातील वाटवी गावातील रेशन दुकानदाराची मनमानी सुरु आहे. त्यामुळे त्याच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थ गोरजी गोबजी गावित यांनी तहसीलदार उल्हास देवरे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
अनेक वर्षांपासून दुकानदार पुरवठा विभागातील काही अधिकार्यांच्या संगनमताने सुरु असलेल्या काळा बाजारासाठी पात्र लाभार्थ्यांना धान्य देण्यास नकार देत आहे. माझ्या मुलीने दुकानदारास काही विचारणा केल्यावर तुमचे रेशन कार्ड केशरी आहे. केशरी कार्डावर धान्य मिळणार नाही, असे प्रतिउत्तर देत हाकलून दिले. त्याचप्रमाणे मी स्वत: नवापूर पुरवठा कार्यालयात धान्य न मिळण्याची चौकशी करण्यास गेल्यावर मला माझे रेशनकार्ड रद्द करण्याची व जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. नवापूरहुन घरी आल्यावर मला व माझ्या परिवाराला पुरवठा अधिकारी रवींद्र कानडे यांच्यासमोर आम्हाला मारहाण करण्यात आली. त्याचप्रमाणे कोरोनाच्या संकटात गरजू लोकांना कोणत्याही प्रकारचा रोजगार किंवा कामधंदा नसल्यामुळे केंद्र सरकारने मोफत धान्य मिळावे, म्हणून जिल्हाधिकारी कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार न करता गरजू लोकांना धान्य वाटप करण्याचे आदेश देण्यात आले. परंतु रेशन दुकानदारांना जो भ्रष्टाचार करायचा आहे तो ते करत आहे. म्हणून दादागिरी, मनमानी व गैरव्यवहार करणार्या अशा रेशन दुकानदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी निवेदनात नमूद आहे.
निवेदनावर वाटवी गावातील अर्जुन गावित, मालजी गावित, वसंत गावित, घर्जी गावित, सतिष वळवी, विल्पेश गावित, बिबीबाई गावित, सुनील गावित, रविता गावित, रमिलाबाई गावित, अनिशा गावित, गणेश नाईक, जांबुबाई वळवी, मोलू पाडवी, अनिल वळवी, प्रभ वळवी, अजित वळवी, दिलीप वळवी, विलास वळवी, सुरेश वळवी, रवींद्र वळवी, रविदास पाडवी, कल्पेश वळवी आदींच्या स्वाक्षर्या आहेत.