वाढत्या तापमानामुळे केळी घड निसटून होतेय उत्पादकांचे नुकसान

0

रावेर। केळीचे उत्पादन घेतले जाणार्‍या रावेर तालुक्यात एप्रिलच्या मध्यातच मे हिट सारख्या 47 डिग्रीच्या असह्य तापमानामुळे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. प्रतिकूल, असह्य तापमानात केळीची खोडं खाली जमिनीवर पडत आहे तर फळारुपाला येणारा परिपक्व झालेली केळीची घडं निसटून उत्पादकांची अपरिमित हानी सुरु झाली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये चिंता आहे.

संरक्षित विमा मिळवून देण्याची आवश्यकता
तीव्र तापमानाचे विपरीत परिणाम तत्क्षणीच दिसणारे नसून कालांतराने केळीबाग उद्ध्वस्त झाल्याचे दृष्टिक्षेपात पडत असल्याने शासनाच्या कृषी विभागाने फळपीक विमा कंपनीला यासंदर्भात पाठपुरावा करुन केळी उत्पादकांना त्यांच्या न्यायहक्काच्या संरक्षित विमा मिळून देण्यात न्यायाची भूमिका बजवावी अशी अपेेक्षा व्यक्त केली जात आहे.

गारपिटीपेक्षाही तापमानाचा परिणाम
एकीकडे निर्यातक्षम केळी उत्पादनाचे गोडवे गायिले जात असतांना एखाद्या गारपिटीच्या तडाख्यालाही लाजवावा असा हा एप्रिल महिन्याच्या मध्यातील सनस्ट्रोकचा तब्बल 47 अंश सेल्सियस डिग्रीच्या तापमानाचा आकाश फाडून केळीला दिला जाणार तडाखा केळी उत्पादकांना ठिगळ लावण्यासाठी दुरापास्त ठरल्याने शेतकरीवर्ग कमालीचा चिंताक्रांत झाला आहे. चैत्रातच वैशाख वणवा पेटवणारी आग सुर्य मार्च महिन्यांनंतरही आता एप्रिलच्या मध्यातच ओकू लागला आहे. केळीला प्रतिकूल ठरणार्‍या 47 सेल्सियस ड्रिगी तापमानाची उष्णलहर कालपासून निर्माण झाल्याने केळीच्या माहेरातच बसणारे चटके केळीची प्रचंंड हानी करणारे ठरले आहेे.

जुनारी संपुष्टात येण्याच्या मार्गावर
केळीमालाची बेभावाने होणारी विक्री पाहता नवती केळीचे क्षेेत्र साडेअकरा हजार हेक्टरपर्यंत येवून ठेपले आहे. साडेनऊ हजार हेक्टरमधील जुनारी आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. त्या तरी कांदा लागवडीतून होणार्‍या बागांमध्ये अतिउष्ण वा अतिथंड तापमान सहन करण्याची जी सहनशक्ती असते ती मात्र ऊतीसंवंर्धित केळीबागांमध्ये राहत नसल्याने ऊतीसंवंंर्धीत केळी बागांचे या प्रतिकूल तापमानात मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे चित्र आहे.

शेतकरी सापडला संकटात
केळीला किमान 40 सेल्सियस तापमानाची कमाल मर्यादा आहेेत मात्र एप्रिलच्या मध्यातच सुरु झालेल्या या प्रतिकूल 47 सेल्सियस तापमानामुळे केळी बागांची कमालीची अपरिमित हानी होणार आहे. ऊर्तीसंवंर्धीत केळीसह काही महालक्ष्मी वाणाचे केळीबागांचे घड निसटून पडणे, अपरिपक्व अवस्थेतच केळीचे खोड खाली पडून अर्ध्यातून तुटून पडणे या थेट मुळांची खोड उखडून पडणे असे दुष्परिणाम सनस्ट्रोकच्या तडाख्यात दिसून येत आहे. त्यामुळे लागवडीपासून ते खोड फळारुपाला येईपावेतो एखाद्या नवजात शिशुप्रमाणे केळीखोडांची काळजी घेतली तरी या अस्मानी व सुल्तानी संकटामुळे केळी उत्पादक संकटात सापडला आहे. त्या अनुषंगाने केळी फळपीक विमा योजनेंतर्गत तापमानाच्या निकषाआधारे शासनाच्या कृषी विभागाने संबंधित फळपीक विमा कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा करुन निसर्गदत्त न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.