वाळू वाहतूक प्रकरणी 26 ट्रकांवर दंडात्मक कारवाई

0

85 पैकी उर्वरित 59 ट्रकांच्या कारवाईकडे लक्ष
नवापूर:नंदुरबार जिल्ह्यात वाळू वाहतुकीची बंदी असताना नवापूर तालुक्यातून वाळू वाहतूक केल्याप्रकरणी गेल्या तीन दिवसात 85 ट्रक पकडण्यात आल्या आहेत. यापैकी 26 ट्रकांवर न्यायालयाने दंडात्मक कारवाई केली. उर्वरित 59 ट्रक पोलीस आणि महसूल विभागाच्या आवारात उभ्या आहेत. या सर्वांवर नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

नवापूर हद्दीत पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक धिरज महाजन, दिगंबर शिंपी, नासिर पठाण व पोलीस कर्मचारी आठवड्यापासून वाळू वाहतूक करणार्‍या ट्रक पकडण्याचे काम करीत आहेत. गेल्या तीन दिवसात 86 ट्रक पकडल्या. 20 जूनला 26 ट्रक पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. प्रत्येक ट्रकमध्ये वीस ते बावीस टन वाळू आहे. गुजरात राज्यातील तापी नदीमधून मोठ्या प्रमाणात वाळू उपासा केला जातो. त्याचा लिलाव करून गुजरात राज्यातून महाराष्ट्रात वाळू वाहतूक केली जाते. बाहेरील राज्यातून नंदुरबार जिल्हामार्गे शेजारील जिल्ह्यात किंवा राज्यात होणारी रेतीची वाहतूक नंदुरबार जिल्हा हद्दीतील रस्त्यांच्या मार्गे न करता ती जिल्हा सीमा व जिल्हांतर्गत रस्ते वगळून इतर बाहेरील मार्गांनी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. नवापूर हद्दीत पोलिसांनी कारवाई करून 86 ट्रक पकडल्या आहेत.
गुजरात राज्यातील निझर येथून वाळू घेऊन जाणार्‍या 86 ट्रकला नवापूर पोलिसांनी जुना सीमा तपासणी नाक्याजवळ पकडून तहसील कार्यालयाच्या परिसरात जमा केले आहेत. गुजरात राज्यातील निझर येथून औरंगाबाद, जालना, नाशिक, धुळे, चाळीसगाव याठिकाणी वाळूचे भरलेले ट्रक जात असताना ही कारवाई करण्यात आली आहे. यासंदर्भात वाळूची वाहतूक करणार्‍या ट्रक चालकांना विचारणा केल्यावर त्यांच्याकडे वाहतूक आणि वाळू संदर्भात सर्व कागदपत्रे असल्याचे सांगितले. परंतु नंदुरबार जिल्ह्यात बंदी असताना ट्रक मार्गस्थ होत असल्याने कारवाई केली आहे.

*ट्रक चालकांची तहसील, पोलीस ठाण्याच्या आवारात गर्दी*
याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्याकामी न्यायालत समक्ष पाठविण्याची कारवाई सुरु आहे. आतापर्यंत 85 वाहनावर कारवाई केली आहे. त्यात 26 वाहनांकडून 2200 रुपयांची दंडात्मक कारवाई न्यायलयाने केली आहे. आता 59 वाहने तहसीलच्या आवारात उभी आहे. नवापूर प्रशासन वाळुच्या ट्रका पकडून कारवाई केल्याबद्दल प्रशासनाचे स्वागत होत आहे. परंतु, ट्रक चालक तहसील कार्यालय व पोलीस ठाणे आवारात गर्दी करत आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे सर्व चालकांना सोशल डिस्टनसाठी पर्यायी तात्पुरती व्यवस्था प्रशासनाने करुन देण्याची गरज आहे. सर्व चालक एकत्र बसुन गर्दी करत राहिल्यास कोरोनाचा संसर्ग होण्याची भिती व्यक्त होत आहे.