विजयस्तंभ मानवंदना सोहळ्यावर ‘ड्रोन’चा वॉच

0

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचा पाहणी दौरा 

सुविधा पुरविण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

कोरेगाव भीमा : 1 जानेवारी रोजी ऐतिहासिक विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी येणार्‍या नागरिकांसाठी 11 ठिकाणी पार्किंग व इतर भौतिक सुविधा देण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. येथील नागरिकांच्या सुरक्षेची हमी प्रशासनावर असतानाच संपूर्ण गर्दीवर ड्रोन कॅमेर्‍याद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू देणार नाही, असा ठाम विश्‍वास जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बुधवारी व्यक्त केला. यासोबतच या परिसराचा विकास आराखडा अंतिम टप्प्यात असल्याचेही त्यांनी साांगितले.

विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणार्‍या नागरिकांच्या सुख-सुविधांची पाहणी व स्थानिक नागरिकांशी संवाद साधण्यासाठी कोरेगाव भीमा, वढू बुद्रुक या ठिकाणी जिल्हाधिकारी नवल किशोर राम व जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश मोरे, गजानन टोणपे, तहसीलदार रणजीत भोसले, पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, संदीप जठार, संगीता कांबळे, रेखा शिवले, शैलेंद्र मोरे, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष माऊली भोसले, श्रीमंत भोसले याप्रसंगी उपस्थित होते.

शांतता ठेवण्यास मदत करा

सोशल मीडियावर आलेल्या प्रक्षोभक मजकुरांवर विश्‍वास न ठेवता पोलीस प्रशासनाला कळवून परिसरात शांतता ठेवण्यास मदत करावी. मानवंदनेसाठी येणार्‍या बांधवासांठी 11 ठिकाणी वाहनतळ व्यवस्था, बसने अंतर्गत वाहतूक, 150 पाण्याचे टँकर, 10 किलोमीटर अंतरावरील प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेर्‍यांसह ड्रोन कॅमेर्‍यानेही विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. यासोबतच अग्निशमन, रुग्णवाहिका यंत्रणा सज्ज असल्याचे सांगत कोणत्याही फलकात वादग्रस्त मजकूर आढळल्यास तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे, असे नवल किशोर राम यांनी सांगितले. 1 व 2 जानेवारीला दंगलीत झालेल्या नुकसानीसाठी 7 कोटी 13 लाख रुपयांचा निधी देण्यात आला असून 6 कोटींपेक्षा जास्त नुकसानभरपाईचे वाटप करण्यात आले आहे. याबरोबरच आणखी मदत देणे बाकी असल्याचे राम यांनी सांगितले.

समाजकंटकांना तडीपार करू

या वर्षी सर्वाधिक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून कोरेगावात प्रशासनाने चांगली तयारी केली आहे. पोलीस प्रशासनाला स्थानिक मदतीसाठी गावात शांतिदूत तयार करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले. परिसरात सामाजिक स्थैर्य व कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी स्थानिक नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा असतानाच जातीय तणाव निर्माण करणार्‍यांवर पोलीस प्रशासनाचे बारीक लक्ष आहे. समाजात तेढ निर्माण करणार्‍या समाजकंटकांना तडीपार करू, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिला.

तीन गावांच्या विकास आराखड्याचे काम अंतिम टप्यात

पेरणे, कोरेगाव भीमासह वढू बुद्रुक परिसराचा विकास आराखडा अंतिम टप्प्यात असून येथील पाणी, रस्ते याबरोबरच परिसराचा विकास करण्यासाठी बांधकाम विभागाने आराखडा तयार करण्याचे काम पूर्ण होत आले आहे. या ठिकाणी 70 ते 80 कोटी रुपयांची विकासकामे लवकरच मार्गी लागतील, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले. यावेळी ग्रामस्थांनी आपल्या व्यथा मांडताना दंगलीत झालेल्या नुकसानीच्या भरपाईचे पंचनामे होऊनही अद्याप नुकसानभरपाई मिळाली नसल्याचे सांगितले. वादग्रस्त मजकूर टाकणार्‍या फ्लेक्सवर कारवाई करण्याचीही मागणी यावेळी करण्यात आली. गोविंद गोपाळ यांच्या समाधीस्थळावर पाणी, विजेची मागणी ग्रामस्थांनी केली.