विजय मल्ल्यावर कारवाई होणार, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

0

नवी दिल्ली : भारतीय बँकांना कोट्यवधीला चुना लावून परदेशात फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्यावर अखेर कारवाई होणार आहे. सक्तवसूली संचालनालयाकडून (ईडी) होणारी कारवाई थांबविण्यासाठी मल्ल्याने केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे मल्ल्याभोवतीचा कारवाईचा फास आवळला गेला आहे.

विजय मल्ल्याला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करून ईडीने त्याच्याविरोधात कारवाई सुरू केली होती. त्यामुळे त्याने ही कारवाई थांबविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र कोर्टाने त्याची याचिका फेटाळून लावली. तसेच नोटीस बजावून मल्ल्याविरोधात कारवाई करण्याची प्रक्रिया सुरूच ठेवण्याचे निर्देशही कोर्टाने ईडीला दिले. त्यामुळे त्याच्या भोवतीचा फास आवळला गेला आहे.

विजय मल्ल्यावर १७ बँकांचे तब्बल ९ हजार कोटींचे कर्ज आहे. मल्ल्याने २००७ ते २०१२ या दरम्यान बँकांकडून कर्ज घेतले परंतु, त्याची परतफेड केली नाही. मल्ल्याने परदेशात पलायन केल्यानंतर बँकांनी त्याची संपत्ती विकून आतापर्यंत ९६३ कोटी रुपयांची वसुली केली आहे.